कोल्हापुरात धुवांधार, नदीकाठच्या गावांना स्थलांतरित होण्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन
कोल्हापूर – गेल्या २ दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोल्हापुरातही पावसाने हाहाकर माजवला असून नदीकाठच्या गावांना त्वरीत दुसरीकडे स्थलांतरीत होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दौलत दैसाई यांनी केलंय. कोल्हापुरातील पंचगंगा नदी आपली पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी जनावरांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचं आवाहन करण्यात आलंय.
गेल्यावर्षी महापुराचा फटका कोल्हापूरला सर्वाधिक बसला होता. कोल्हापुरातील अनेक गावे बरेच दिवस पाण्याखाली होते. त्यामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. कित्येक दिवस अनेक गावे अंधारात होती. या दु:खातून कोल्हापूर अजूनही पुरते सावरलेले नसताना यावर्षीही पावसाने कोल्हापुरात हाहाकार माजवलेला आहे. त्यामुळे गेल्या वर्षाचा अनुभव पाहता चिखली आणि आंबेवाडीसह करवीर तालुक्यातील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे गेल्यावर्षी जोतिबा केर्ली रस्ता खचला होता, यंदाही या रस्त्याला पावसाचा फटका बसला असून हा रस्ता पुन्हा खचला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसमोर गेल्यावर्षीच्या महापुराची आठवण पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभी राहिली आहे. दरम्यान, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जोतिबाच्या दिशेला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 35 फुटांवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील जवळपास 86 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरण 90 टक्के भरलं आहे. शहरातील सखल भागात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. नंदगाव इथल्या प्राथमिक शाळेत पाणी शिरले, तर कोवाड बाजारपेठही जलमय झाली आहे. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. रस्त्यावर पाणी आल्यानं कोल्हापूर गगनबावडा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात जाणारी वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.