कोरोनाविरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राला पीएम केअर्समधून मदत द्या, संजय राऊत यांची मागणी
![No pressure on CM- Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/sanjay-raut-1200-2.jpg)
नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे सध्या देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन लाखांवर पोहोचली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने महाराष्ट्राला पीएम केअर निधीमधून मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेमध्ये केली आहे. तसेच कोरोनाविरोधातील लढाईत कुणीही राजकारण आणू नये, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.
गुरुवारी राज्यसभेमध्ये कोरोनाचा साथीच्या नियंत्रणाबाबत चर्चा झाली. त्यावेळी चर्चेत सहभागी झालेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. तसेच महाराष्ट्राला पीएम केअरमधून निधी देण्यात यावा अशी मागणी केली. त्याबरोबरच केंद्र सरकारकडे थकीत असलेला राज्याच्या वाट्याचा जीएसटीचा परतावा केंद्र सरकारने लवकरात लवकर द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल तसेच दिल्लीसारखी राज्ये कोरोनाची परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळत नाहीत. तर भाजपाशासित राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे, अशातला भाग नाही, सर्वच राज्ये या संकटाचा सामना करत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत एकमेकांकडे बोट दाखवणे योग्य ठरणार नाही, असे सांगत कोरोनाविरोधातील लढाईत राजकारण आणू नका असे आवाहन संजय राऊत यांनी केले.
सप्टेंबर महिन्यापासून केंद्राने मदतीचा हात आख डता घेतला आहे. वैद्यकीय उपकरांचा पुरवठा केंद्र सरकारकडून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यावर सुमारे साडेतीनशे कोटींचा अधिक बोजा पडणार आहे, असा दावाही राऊत यांनी यावेळी केला. दरम्यान, या चर्चेवेळी शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही कोरोनाच्या मुद्द्यावरून राजकारण न करण्याचे आवाहन केले.