“करोना नष्ट करण्यासाठी ‘जय श्री रामा’चा जयघोष करा”- महंत परमहंस यांचा अजब दावा
सध्या देशात करोना व्हायरसने थैमान घालण्यास सुरुवात केली असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. करोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार सध्या सर्वोपतरी प्रयत्न करत आहे. दरम्यान अयोध्येत महंत परमहंस यांनी अजब दावा केला आहे. करोना नष्ट करण्यासाठी ‘जय श्री रामा’चा जयघोष करा असा सल्ला त्यांनी दिला आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत स्वच्छ भारत आणि सक्षम भारत महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी हे अजब वक्तव्य केलं.
त्यांनी म्हटलं आहे की, “जेव्हा एखादी गोष्ट लोकांच्या नियंत्रणात राहत नाही तेव्हा त्यात वैदिक प्रयोग केले जातात. वैदिक मंत्रांच्या सहाय्याने त्याला दूर केलं जातं. करोनाचे जे किटाणू आहेत ज्यामुळे त्याचा फैलाव होत आहे त्यांचा खात्मा आजपासून होण्यास सुरुवात होणार आहे. करोनाचे रुग्ण आता ठणठणीत होतील. संपूर्ण जगातून करोना नष्ट होईल”.