औरंगाबादमध्ये लागू होणाऱ्या जनता कर्फ्यू मध्ये भाजीपाला व मेडिकलही बंद राहणार!
औरंगाबादमध्ये वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे १० ते १८ जुलै या कालावधीत कडक संचारबंदीची घोषणा प्रशासनाने केली आहे. या कालावधीत उद्योग, व्यापारही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच संचारबंदीच्या कालावधीत भाजीपाला आणि मेडिकल सुद्धा बंद राहणार असून औषधी पुरवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
जनतेने यास प्रतिसाद द्यावा, घरात बसून सहकार्य करावं, हा प्रशासनाचा कर्फ्यू नसून हा जनतेने स्वत:हून लागू केलेला जनता कर्फ्यू आहे, असं जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितलं.
आज विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या कार्यालयात शहरातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत औरंगाबादमधील वाढत्या करोनाच्या प्रादुर्भावावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा जिल्हाधिकारी चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन जनता कर्फ्यूची घोषणा केली. तसेच वाळूज परिसरात उद्योग धंदे बंद आहेत. एमआयडीसी पूर्ण बंद आहे. शिवाय या परिसरातील लोकांनी स्वत:हून किराणा दुकानेही बंद ठेवली आहेत, असं सांगतानाच पोलीस, स्वयंसेवक आणि जिल्हा प्रशासन या जनता कर्फ्यूवर वॉच ठेवून असतील, असंही ते म्हणाले.