इम्रान खान बिथरले, नवाझसह 40 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/imran-khan-1-1.jpg)
पाकिस्तानात विरोधी पक्षांच्या आघाडीमुळे इम्रान खान सरकार बिथरलेले दिसत आहे. विरोधकांवरील नियंत्रणांसाठी विरोधकांवर सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे सुरू केले आहे. या १ ऑक्टोबरला इस्लामाबादेत माजी पंतप्रधान नवाझ शरीफ, त्यांची मुलगी मरियम आणि पीओकेचे प्रमुख नेते राजा मोहंमद फारुख अहमद खान यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. तिघांविरोधात एका स्थानिक नागरिकाने तक्रार केली होती. सूत्रांनुसार, नवाझ शरीफांवर लंडनमधून पाकविरोधी प्रक्षोभक भाषणे करत असल्याचा आरोप आहे. ते पाकच्या राज्यघटनेचा अपमान करत आहेत. एफआयआरमध्ये नवाझ यांच्या पीएमएल (एन) पक्षाच्या ४० नेत्यांचे नाव आहे.
विरोधी आघाडी पाकिस्तानी डेमोक्रेटिक मुव्हमेंटमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ (पीएमएल- एन), पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी), अवामी नॅशनल पार्टी आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम फजल (जेयूआई-एफ) हे प्रमुख पक्ष आहेत. आघाडीचे प्रमुख जेयूआय-एफचे प्रमुख मौलाना फजलूर रहमान आहेत. ज्यांनी इम्रान सरकारविरोधात आझादी मोर्चाचे नेतृत्व केले होते.
विधानसभेत राजीनामा, जानेवारीत लाँग मार्च काढण्याचा इशारा
विरोधकांची नवीन आघाडी देशात राजकीय क्रांती घडवेल, असे नवाझ यांच्या पक्षाने म्हटले आहे. पीपीपी नेते बिलावल भुत्तो झरदारी म्हणाले, सरकार राष्ट्रीय उत्तरदायी विभागावर दबाव टाकत आहे. आता देशामध्ये मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहोत. यात अनेक मोर्चे काढले जातील. तसेच विधानसभेतही राजीनामे दिले जातील. जानेवारीत इस्लामाबादेत लाँग मार्च काढला जाईल.
विरोधकांकडून पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी
विरोधकांच्या संयुक्त आघाडीने आपल्या बैठकीत २६ मुद्द्यांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यात पाकिस्तानच्या स्वातंत्र्यानंतर सरकारने येथील नागरिकांवर जाणूनबुजून अत्याचार केले असे म्हटले आहे. विशेषत: नेत्यांना निशाणा बनवण्यात आले. यात सैन्याची भूमिका मोठी आहे. राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय विरोधकांनी इम्रान यांच्या राजीनाम्यासह देशात पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.