अखिल भारतीय आखाडा परिषद हिंदू मंदिरे मुक्त करण्याच्या अभियानासाठी पुढाकार घेणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/aakhil-bhartiy-aakada.jpg)
नवी दिल्ली – अयोध्या रामजन्मभूमी लढ्याप्रमाणेच मथुरा आणि वाराणसी येथील हिंदू मंदिरे मुक्त करण्याच्या अभियानासाठी आम्ही पुढाकार घेऊ, यासाठी कायदेशीर लढा देणार असल्याची घोषणा अखिल भारतीय आखाडा परिषदेने नुकतीच केली आहे. सर्व 13 आखाडा प्रमुखांची आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली प्रयागराज येथे बैठक पार पडली. या बैठकीत हा ठराव संमत करण्यात आला.
यावेळी बोलताना महंत गिरी यांनी म्हटले की, वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर व मथुरा येथील कृष्ण ज्नमभूमी मुक्त करण्यासाठी आज आम्ही ठराव संमत केला आहे. मुघलशाहीच्या काळात मुस्लिम आक्रमकांनी आणि दहशवाद्यांनी आमची मंदिरे उद्धवस्त करून त्या ठिकाणी मशिदी व मकबरे बांधले. ज्या प्रमाणे संत समुदयाने अयोध्येतील राम जन्मभूमीसाठी मोहिम राबवली व प्रकरण निकाली निघाले, त्यानुसार आम्ही वाराणसी व मथुराबाबत करण्याचे ठरवले आहे. वाराणसी व मथुरा येथील हिंदू मंदिरे पाडण्यात आल्याप्रकरणी आखाडा परिषदेच्यावतीने तक्रारीदेखील दाखल केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मंदिरे मुक्त करण्यासाठीच्या कायदेशीर लढ्यात आम्ही विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यासारख्या हिंदुत्ववादी संघटनांचीदेखील मदत घेणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की या कायदेशीर लढाईचा निकाल आमच्या बाजूनेच लागेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.