चिंतादायी! नगर जिल्ह्यामध्ये तीन महिन्यांत १८ हजार बालके बाधित
नगर |
नगर जिल्ह्य़ामध्ये बाधितांमध्ये बालकांचे प्रमाण वाढत असून गेल्या तीन महिन्यांत १८ हजार बालकांना करोना झाला, तर एकटय़ा मे महिन्यामध्ये शून्य ते अठरा वयोगटातील बाधित मुलांची संख्या ९ हजार ९२८ इतकी आढळली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगितले. मात्र बालरोगतज्ज्ञांच्या माहितीनुसार हे प्रमाण सर्वसाधारण स्वरूपाचे आहे. नगरमध्ये मे महिन्यात एकूण ८० हजार ७८५ नागरिकांना मे महिन्यात संसर्ग झाला होता. या तुलनेत बालके बाधित होण्याचे प्रमाण प्रमाण ११.६५ टक्के होते.
दरम्यान, राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांनी तिसऱ्या लाटेत बालकांना मोठय़ा प्रमाणावर संसर्ग होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सरकारने राज्यस्तरीय बालरोगतज्ञांचा कृती गट स्थापन केला आहे. त्याचबरोबर बालकांवरील उपचारांच्या दृष्टीने रुग्णालयस्तरावर पायाभूत सुविधा, यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी सुरू असल्याचे आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
राज्यस्थिती :
राज्यभरात करोनाला बळी पडलेल्या १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे २०२१ मध्ये सुमारे ०.०७ टक्के इतके आहे. नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या दरम्यान वयोगटानुसार बाधितांचे प्रमाण – शून्य ते पाच वर्षे – १.३ टक्के, ६ ते ११ वर्षे – २.४ टक्के, १२ ते १७ वर्षे- ४.१ टक्के; एकूण ७.८ टक्के, असे आहे.
लहान मुलांमध्ये आजाराचे प्रमाण कमी असून पालकांनी घाबरून जाऊ नये
– डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव.