कोकणात जाणाऱ्यांसाठी नियम बंधनकारक; राजेश टोपेंचे वक्तव्य
![70 to 80 lakh people in the state have not yet received first dose of vaccine - Rajesh Tope](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Rajesh-Tope1.jpg)
जालना |
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांनी शासकीय नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. कोकणात जाण्यासाठी लशीच्या दोन मात्रा किंवा आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य असेल का , या प्रश्नास उत्तर देताना टोपे म्हणाले,की करोना संदर्भात साथरोग आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली शासकीय पातळीवर ज्या सूचना केल्या जातात, त्याचे तंतोतंत पालन जनतेने केले पाहिजे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकाऱ्यांनी कोकणातील प्रवेशासाठी घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर टोपे म्हणाले, ओणम सणाच्या वेळी झालेल्या गर्दीमुळे केरळातील करोनाबाधितांची संख्या दररोज ३१ हजारांपर्यंत वाढली. या अनुषंगाने आपण केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली असता वाढलेली गर्दी यामागचे कारण असल्याचे स्पष्ट झाले. केरळमध्ये सणासुदीच्या वेळी झालेल्या गर्दीमुळे झालेली रुग्णवाढ पाहता, ‘पुढच्याच ठेच, मागचा सावध’ या उक्तीनुसार केंद्राने महाराष्ट्रास काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. सणासुदीच्या काळात गर्दी होऊन करोना संसर्ग वाढू नये यासाठी राज्यात काही अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत.