महापालिकांना तसा सरसकट आदेश द्यावा; मनसेची ठाकरे सरकारकडे महत्त्वाची मागणी
मुंबई |
देशात आणि राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढले. अनेक रुग्णांना बेड, ऑक्सिजनअभावी प्राण गमवावे लागले. अनेक घरातील कर्ती माणसं करोनाच्या दुसऱ्या लाटेत गेली. त्यामुळे अशा कुटुबांवर दुःखाच्या डोंगराबरोबरच आर्थिक डौलाराही कोसळला आहे. आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या करोना पीडितांच्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्य सरकार आणि महापालिकांकडे महत्त्वाची मागणी केली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली. आरोग्य सुविधांची वाणवा निर्माण झाली. बेड, औषधी आणि ऑक्सिजनसाठी नातेवाईकांचे हाल झाले. इतकं करूनही अनेकांना आपल्या प्राणप्रिय व्यक्तींना गमवावं लागलं. यात अनेकांनी कुटुंबाचा आधार असलेल्या आणि आर्थिक डौलार सांभाळणाऱ्या कुटुंबप्रमुखांना गमावलं.
तर अनेकांना जमा केलेली पुंजी कुटुंबातील व्यक्तीच्या उपचारासाठी खर्च करावी लागली. त्यामुळे ही कुटुंब आर्थिक समस्यांचा सामना करताना दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करून एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे ठाकरे सरकारचं लक्ष वेधलं आहे. “महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच महापालिका या श्रीमंत आहेत. अनेकांकडे हजारो कोटींच्या ठेवी आहेत. हा जनतेचा पैसा आहे आणि हा जनतेच्याच कामाला आला पाहिजे. करोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या घरच्यांना यावर्षी घरपट्टी माफ करणं गरजेचं आहे. सर्वच स्थानिक संस्थांनी हे त्वरित करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा. राज्य सरकारने सरसकट तसा आदेशच द्यायला हवा. सरकारने/महापालिकांनी जनतेप्रती आपली जवाबदारी झटकू नये,” असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच महापालिका या श्रीमंत आहेत अनेकांकडे हजारो कोटींच्या ठेवी आहेत.हा जनतेचा पैसा आहे आणि हा जनतेच्या च कामाला आला पाहिजे. कोरोना मुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या घरच्यांना यावर्षी घरपट्टी माफ करणे गरजेचे आहे. सर्वच स्थानिक संस्थांनी हे त्वरित करून
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) May 24, 2021