महाराष्ट्रात लसीकरणासाठी ‘मिशन कवच कुंडल’ मोहिम – राजेश टोपे
![70 to 80 lakh people in the state have not yet received first dose of vaccine - Rajesh Tope](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Rajesh-Tope1.jpg)
मुंबई – महाराष्ट्राचा देशाच्या लसीकरणात मोठा सहभाग असावा. त्यासाठी आम्ही ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत मिशन कवच कुंडल योजना राबवणार आहे. दररोज किमान १५ लाख लसीकऱण झालं पाहिजे असं ध्येय आहे. लस उपलब्ध नसायची अशी परिस्थिती आता नाही. जवळजवळ ७५ लाख लशी उपलब्ध आहेत. सहा दिवसांत स्टॉक संपवण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागाला दिलं आहे.
आरोग्यमंत्री म्हणाले की, आजपर्यंत लसीकरणाची टक्केवारी पाहता ६२ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. महाराष्ट्राला ९ कोटी १५ लाख एवढंं एकूण उद्दिष्ट आहे. यापैकी ६ कोटी पहिला डोस घेतलेल्यांची संख्या आहे. ३ कोटी २० लाख लसीकरण झालं तर राज्यातील १८ वर्षांच्या सर्व नागरिकांना पहिला डोस देऊन पूर्ण होईल. यामुळे लोकांना संरक्षण मिळेल. दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ही अडीच कोटींच्या घरात आहेत. ३० टक्के दोन डोस पुर्ण केले आहेत. उरलेले ३ कोटी डोस दिले तर तिसऱ्या लाटेची भीती कमी होण्यास मदत होईल.
महाराष्ट्राकडे कोरोना प्रतिबंधक लशीचे १ कोटी डोस आहेत. पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण 62 टक्के आहे. लसीकरणाला महत्त्व देण्याचं कारण म्हणजे यामुळे धोका कमी होईल. काही लोकांची काळजी घेण्याची गरज आहे. ग्रामपंचायत आणि प्रभाग पातळीवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली.
लोकांना जनजागृती करण्याचं काम आरोग्य विभाग करेलच. त्यासोबत जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यायचा आहे. सर्व पक्षाच्या लोकांना, लोकप्रिय व्यक्तींना जागरुक करण्याचं काम करा असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.