#CoronaVirus: कोरोनाची साथ सप्टेंबर मध्यापर्यंत संपुष्टात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/2-3.jpg)
भारतातील कोविड १९ साथ सप्टेंबरच्या मध्यापर्यंत संपुष्टात येईल असा अंदाज दोन आरोग्य तज्ज्ञांनी गणिती प्रारूपाच्या मदतीने वर्तवला आहे. जेव्हा संसर्ग रुग्णांची संख्या ही मृत्यू किंवा बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येइतकी होते तेव्हा स्थिरांक १०० टक्क्य़ांना पोहोचतो व साथ आटोक्यात आल्याचे स्पष्ट होते.
‘एपिडिमियॉलॉओजी इंटरनॅशनल’ या नियतकालिकात प्रसिद्ध संशोधनानुसार ही साथ सप्टेंबरच्या मध्यावधीत आटोक्यात येईल. या संशोधनात सार्वजनिक आरोग्य विभागाचे उप महासंचालक डॉ. अनिल कुमार, कुष्ठरोग विभागाच्या उप सहायक संचालक रुपाली रॉय यांनी भाग घेतला. त्यांनी ‘बेलीज गणितीय प्रारूप’ वापरले असून त्यानुसार हा अंदाज केला आहे.
साथरोगाची विभागणी संसर्गित रुग्ण व त्यातून बाहेर पडलेले व मृत रुग्ण अशा विभागात केली जाते. सातत्यपूर्ण संसर्गाचे प्रारूप वापरण्यात आले असून त्यात संसर्ग असलेले रुग्ण वाढत असले तरी मृत्यू किंवा बरे होण्याने संसर्गाचे स्रोत बाद होत जातात.
संसर्ग असलेल्या लोकसंख्येतून बरे झालेले व मृत्यू पावलेले बाहेर पडतात, त्यांची टक्केवारी यात काढली जाते. एकूण संसर्ग व एकूण बरे होण्याचा दर यांचा संबंध ताडून पाहिला जातो. भारतात कोविड १९ साथ २ मार्चला सुरू झाली, त्यानंतर निश्चित रुग्णांची संख्या वाढतेच आहे. कोविड १९ बाबत वल्डरेमीटरवर जी माहिती आहे त्याचा वापर यात केला आहे.
१ मे ते १९ मे या काळात बरे झालेले रुग्ण व मृत्यू पावलेले रुग्ण यांची बेरीज करण्यात आली. बेलीच्या ‘रिलेटिव्ह रिमुव्हल रेट’ नियमानुसार भारतात सप्टेंबरच्या मध्यावधीत ‘रिग्रेशन अॅनॅलिसिस’ आलेखाची रेषा १०० वर जाते व ती सरळ रेषा आहे. या पातळीवर संसर्ग असलेले रुग्ण व संसर्गातून बाहेर पडलेले किंवा मरण पावलेले रुग्ण यांच्या वजा प्रमाणाचा स्थिरांक १०० टक्क्य़ांवर जातो. मात्र, या संशोधनात वापरलेली दुय्यम आकडेवारी व दरम्यानच्या काळात बदलत जाणारे घटक यामुळे या संशोधनातील निष्कर्षांना अनेक मर्यादा आहेत.