कोरोना व्हायरस हळू हळू पसरतोय देशभर…बळींची संख्या आतापर्यंत 100 च्यावर

मुंबई | महाईन्यूज|
कोरोना व्हायरस हळू हळू देशभर पसरत चाललाय.चीनमध्येही सध्या कोरोना व्हायरसची प्रचंड लागन झाली आहे. चीनमधल्या बळींची संख्या आता 100 वर गेलेली आहे. आतापर्यंत चीनमध्ये तीन हजाराच्या आसपास लोकांना याची बाधा झाल्याचं नक्की झालंय. तर 300 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं चिनी सरकारी मीडियाने म्हटलं आहे. विशेषकरुन चीनच्या दक्षिण आणि पूर्वेतील देशांमध्ये कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. यामध्ये थायलंड, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियासारख्या देशांचा समावेश आहे. पण चीन बाहेर आतापर्यंत या विषाणू बाधेमुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही.

भारतातही संशयित रुग्ण आढळल्याचा दावा केला जात आहे. चीनमध्ये पसरलेल्या भीषण कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण मुंबई, पुण्यात आढळून आल्याने खळबळ माजली होती. चीनमधून महाराष्ट्रात परतलेल्या पाच जणांना कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव असल्याच्या संशयाने त्यांना स्पेशल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. या पाच पैकी तीन जण मुंबईतील आहेत, तर दोन जण पुण्यातील आहेत. पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या(एनआयव्ही)केलेल्या तपासणीत हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. भारताला लागून चीनची मोठी सीमा आहे, त्यामुळेच हा व्हायरस आपल्या देशात पसरण्याचा धोका वाढल्याचे बोलले जात आहे.

प्राण्यांपासून या विषाणूचा मनुष्याला संसर्ग होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.

कोरोना व्हायरसची लक्षणे काय आहेत…
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.

विषाणूचा प्रसार कुठून होऊ लागला?
कोरोना व्हायरस पहिल्यांदा चीनच्या वुहान शहरातून पसरु लागला आणि त्यानंतर याचे पीडित रूग्ण थायलंड, सिंगापूर, जपानमध्येही आढळून आले. काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमध्ये एका कुटुंबाला या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं होतं.




