चित्रपटसृष्टीवर शोककळा : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड!
![Mourning the film industry: veteran actor Vikram Gokhale behind the curtain of time!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Gokhale-Vikram-Pune.jpeg)
- १७ दिवसांची झुंज अखेर संपली, विक्रम गोखले यांचं निधन
पुणे । मराठी तसेच हिंदी चित्रपटातून आपली ओळख निर्माण करणारे जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा स्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. गेल्या १७ दिवसांपासून ते पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर युद्ध पातळीवर उपचार सुरू होते. मात्र आज २६ नोव्हेंबर रोजी १ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष यादगिकर यांनी त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. आज संध्याकाळी त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.
मराठीचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना मधुमेह आणि जलोदर झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचारांना प्रतिसाद देणं हळूहळू बंद झालं आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. 4 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत अखेरचे काम केले. तर नुकताच प्रदर्सित झालेला ‘गोदावरी’ हा त्यांना अखेरचा सिनेमा ठरला.
दरम्यान, अभिनेते विक्रम गोखले यांनी गेल्याच महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी त्यांचा ७७ वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर काहीच दिवसात अभिनेत्याच्या तब्येतीविषयी चिंताजनक माहिती समोर आली . विक्रम यांनी रंगभूमी, टीव्ही आणि सिनेमा ही तीनही माध्यमं गाजवले आहेत. रंगभूमीवर तर त्यांनी एक मोठा काळ गाजवला. ‘बॅरिस्टर’ नाटकाने विक्रम यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं. जवळपास ८ वर्ष त्यांनी हे नाटक केलं. परखड व्यक्तिमत्त्वासाठी गोखले विशेष ओळखले जायचे.
नाकारले पुरस्कार
विक्रम गोखले यांचा कोणत्याही पुरस्कारांवर विश्वास नव्हता. त्यांनी शासकीय पुरस्कारांनाही नकार दिला. एका मुलाखतीत त्यांनी आपलं मत मांडताना सांगितलं होतं की, ‘पुरस्कार सोहळे हे फक्त फॅशन झाली असून पैसे खिशात घेऊन पुरस्कार घेणारे मी पाहिले आहेत. अशा मांदियाळीत मला बसण्यात स्वारस्य नाही. कोणत्याही पुरस्काराने एखादा नट चांगला आहे की नाही हे सिद्ध होत नाही. त्याचं कामच बोलतं.’