घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरेंची प्रतिक्रिया
मुंबई शहरात जागोजागी मोठ्या प्रमाणात होर्डिंग
![Ghatkopar, hoarding accident, Bharat Ganesh, Reaction, Mumbai city, everywhere, hoardings,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/ganeshpure-780x470.jpg)
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईत अगदी थोड्या वेळात साठी आलेल्या पावसाने मोठा गोंधळ घातला. वादळीवारासह पडलेला हा पाऊस काही कुटुंबांना पोरकं करून गेला. काही ठिकाणी झाड पडली, तर काहींची वाहन उडाली. मात्र या सर्वांना सर्वात मोठी दुर्घटना घाटकोपरमध्ये घडल्याचे पाहायला मिळाले. भले मोठे होर्डिंग पेट्रोल पंप वर पडल्याने त्याखाली उभे असलेले कित्येक जण गाडले गेले तर काहीजण गंभीर जखमी आहे. अद्याप या होर्डिंग काढण्याचे काम पूर्ण झालेले नाही.
या घटनेमध्ये बऱ्याच जणांची कुटुंब ही उध्वस्त झाली. ध्यानीमनी नसताना झालेली दुर्घटना फारच गंभीर होती. अनेक सेलिब्रिटी मंडळींनी या दुर्घटनेबद्दल शोक आणि खेद दोन्ही व्यक्त केला. मुंबईसारख्या ठिकाणी जाहिरात बाजी ही मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यावेळी अनेकांचे जीव धोक्यात येईल याचा विचार केला जात नाही. परिणामी अशा दुर्घटना घडल्यावर त्यावर शोक व्यक्त करण्यापलीकडे कोणताच पर्याय राहत नाही. यावर आता अभिनेते भारत गणेश पुरे यांनी भाष्य केले आहे.
“जर होर्डिंगची साईज कमी केली आणि जर त्या होर्डिंगमध्ये छिद्र केले तर त्यातून वारा निघून जाईल. आजकाल होर्डिंग जाहिराती इतक्या जास्त झालेल्या आहेत की, जो येतो तो उठसूट जाहिराती करतोय. मग त्या राजकीय असतील, काही प्रोडक्ट्सच्या असतील, सिनेमाच्या असतील, वेब सीरिजच्या असतील. मुंबई शहरात जगोजागी मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावले जातात. त्याचं मूळ कारण असं आहे की, येता जाता ते दिसतं म्हणून मोठ्या प्रमाणात ते नजरेत भरतं. त्यामुळे त्याची काळजी घेऊनच ते केलं पाहिजे, नाहीतर ते करू नये, असं मला वाटतं.”
“आता जो अपघात झाला तो खूप विचित्र होता आणि अक्षरशः निरपराध अशा लोकांचा त्याच्यामध्ये जीव गेलेला आहे. जेव्हा एक माणूस मरतो, तेव्हा त्याच्या कुटुंबातले पाच ते सहा जण हे वेठीस धरले जातात. त्यांचं पूर्ण आयुष्य बदलून जातं. सरकारने कितीही मदत केली किंवा काहीही केलं, तरी तो जो माणूस गेलेला असतो तो परत येत नाही; त्यामुळे माझी जाहिरात एजन्सीला विनंती आहे की, त्याची साईज वगैरे बघूनच काम केलं पाहिजे.”
“आपल्याकडे राजकीय पक्षांचेपण खूप होर्डिंग लागतात. गावाकडे तर इतकी बिकट परिस्थिती आहे की, जेव्हा नेत्यांचा वाढदिवस असतो, तेव्हा जे दिशादर्शक बोर्ड असतात त्यावर लोक बॅनर लावतात. तुमचा नेता आहे, त्यांचा वाढदिवस असेल तर तुम्ही बॅनर लावा, पण दुसऱ्या दिवशीच ते काढून घ्या. यामुळे काय होतं, एकतर शहर स्वच्छ राहतं आणि ते बॅनर जर पुढच्या वाढदिवसापर्यंत राहिले तर त्या बॅनरसह नेता आडवा तिडवा होतो. मग तुम्हीच त्या नेत्याचा अपमान करताय असं होतं, म्हणून मला कार्यकर्त्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही होर्डिंग लावा, पण दुसऱ्या दिवशी ते लगेच काढा. आता काय होतंय, महानगरपालिकेची शक्ती त्याच्यामागे लागली आहे. महानगरपालिकेची एक गाडी येते, ती या सगळ्या होर्डिंग्स आणि बॅनर काढते. हा खरंतर अपव्यय आहे; तर आपल्या नेत्याबद्दल खरंच प्रेम असेल तर तुम्ही लावलेलं होर्डिंग तुम्ही स्वत:च काढा.