जिलेबी, बर्फी खातो पण अक्षय कुमार २० वर्षांपासून पाळतो ‘हा’ नियम

Akshay Kumar on Diet : आरोग्याची काळजी घेणे हे सर्वांसाठीच गरजेचे असते. त्यासाठी चौरस आहार, योग्य प्रमाणात व्यायाम, पुरसे पाणी पिणे आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक असते.
अनेक कलाकारही फिटनेसबद्दल वेळोवेळी बोलत असतात. त्यांचे अनुभव सांगत असतात. तसेच, त्यांची दिनचर्या कशी असते, त्यांच्या आहारात कोणते खाद्यपदार्थ असतात, ते गोड किती खातात, किती तास झोप घेतात, कोणत्या प्रकारचे व्यायाम करण्यासाठी ते प्राधान्य देतात अशा अनेक गोष्टींचा खुलासा ते करतात.
अक्षय कुमार हा बॉलीवूडमधील शिस्तप्रिय आणि फिटनेसकडे लक्ष देणारा कलाकार म्हणून ओळखला जातो. तो त्याची दिनचर्या काटेकोरपणे पाळतो. त्याबद्दल त्याने वेळोवेळी सांगितले आहे. विशेष बाब म्हणजे अक्षय कुमारच्या शिस्तबद्ध दिनचर्येबद्दल अनेक कलाकारांनीदेखील वक्तव्य केले आहे.
हेही वाचा – खतांसाठी भारताचा 20 देशांशी संपर्क
आता अक्षय कुमारने स्वत: एका मुलाखतीत त्याच्या आहाराबद्दल वक्तव्य केले होते. तो म्हणालेला की, त्याला जे आवडते, ते तो सगळं खातो. एबीबी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणालेला, “मी छोले पुरी खातो. अनेक जण ते कोणत्या अन्नपदार्थांमधून किती उष्मांक(Calories) आणि किती प्रथिनं(protein) घ्यायची ते मोजून बघतात.मी तसे करत नाही. अनेकांनी विश्वास बसणार नाही; पण मी सामान्य आयुष्य जगतो. मी जिलेबी खातो, मी बर्फी खातो. मला जे खाण्याची इच्छा होते, ते मी खातो.”
पुढे त्याने खुलासा केला की, त्याला जे आवडते, ते जरी तो खात असला तरी तो एक महत्त्वाचा नियम पाळतो. तो म्हणालेला, “साडेसहानंतर मी काहीही खात नाही. गेल्या २० वर्षांपासून मी हा नियम पाळतो. जेव्हा मित्राचा वाढदिवस असतो किंवा इतर काही कार्यक्रम असतात, त्यावेळी क्वचित वेळा हा नियम मोडतो. सौजन्य म्हणून केक टेस्ट करावा लागतो.”
पार्टीमध्ये दारू पिण्याबाबत तो म्हणाला, “काही वेळा मी लोकांना फसवतो. त्यांच्याबरोबर मी दारू घेतो; पण त्यानंतर मी ती फेकून देतो. कारण- दारू प्यायल्यानंतर मला आनंद होत नाही.” अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचे तर, तो लवकरच भूत बंगला या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





