संजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स
नवी दिल्ली – बाॅलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहत असतात. बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटात करण्यात आलेल्या अक्षेपार्ह चित्रणामुळे देशभरात वाद झाले होते. त्यानंतर आता त्यांचा आणखी एक चित्रपट वादात सापडण्याची शक्यता आहे. भन्साळींच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटात अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवल्या गेल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भन्सारी यांच्या चित्रपटाविरोधात गंगुबाई काठियावाडी यांच्या मुलानेच मुंबई न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चित्रपटात अनेक चुकीच्या गोष्टी दाखवल्या असून माझ्या कुटूंबाची बदनामी होत आहे, असा आरोप गंगुबाई यांच्या मुलाने दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या प्रकरणात दिग्दर्शक भन्सारी, अभिनेत्री आलिया भट्ट आणि चित्रपटाच्या लेखकाला न्यायालयाने समन्स बजावले आहे.
लेखक हुसैन हैदी यांच्या ‘माफिया क्वीनस ऑफ मुंबई’ या पुस्तकातून गंगुबाई हे पात्र घेण्यात आलं आहे. कामाठिपुरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या गंगुबाई पुढे जाऊन गँगस्टर करीम लाला यांच्या मदतीने पुर्ण कामाठिपुरावरच आपला वचक बसवला होता. त्यानंतर तिने वेश्याव्यवसाय बंद करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या संघर्षाची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
दरम्यान, कामाठिपुराच्या रहिवाश्यांनी चित्रपटातून कामाठिपुरा उल्लेख काठून टाकावा, अशी मागणी केली आहे. तर त्यासाठी त्यांनी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना भेटून आपलं म्हणणं मांडलं आहे.