बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत, मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुंबई – अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण उजेडात आले. यामुळे अनेक कलाकारांवर टीका करण्यात आली. अखेर या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडलं आहे. “बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. ते आज मल्टिप्लेक्स, सिनेमागृहांच्या मालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे बोलत होते.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरातील मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे बंद ठेवण्यात आली होती. देशातील इतर राज्यात सिनेमागृहांना परवानगी मिळाली असली तरीही राज्यातील सिनेमागृहे अद्यापही प्रतिक्षेत आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मल्टिप्लेक्स, सिनेमागृहांच्या मालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्याबाबत आश्वासन दिलं. “मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही, तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलिवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलिवूडमध्ये बनत आहे. या बॉलिवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेमासृष्टी हे एक मोठं मनोरंजन उद्योग क्षेत्र असून, या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते. तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे. ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.