#Covid-19: जलद व निर्णायक पावले उचला- पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली |
देशाच्या काही भागांमध्ये कोविड-१९च्या संसर्गाची प्रकरणे वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून, करोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘जलद व निर्णायक पावले’ उचलण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. ‘चाचणी करा, शोध घ्या व उपचार करा’ या त्रिसूत्रीचे गंभीरपणे पालन करण्याच्या आवश्यकतेवरही पंतप्रधानांनी भर दिला. करोना महासाथीची परिस्थिती आणि सध्या सुरू असलेली लसीकरणाची मोहीम याबाबत राज्यांच्या मुख्यमंर्त्यांशी मोदी यांनी आभासी चर्चा केली. करोनाच्या विरोधात लस हे परिणामकारक शस्त्र असल्याचे सांगून, सरकारी व खासगी अशा दोन्ही प्रकारची लसीकरण केंद्रे स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी राज्यांना केले.
महाराष्ट्र व पंजाब यांसारख्या राज्यांमध्ये करोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असून, महाराष्ट्र व मध्य प्रदेशमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे जानेवारीत देशात लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून मुख्यमंर्त्यांशी प्रथमच साधलेल्या संवादात मोदी म्हणाले. देशातील ७ राज्यांतील ‘पॉझिटिव्हिटी रेट’मध्ये गेल्या काही आठवड्यांत दीडशे टक्क््याहून अधिक वाढ झाली असल्याबाबत पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. ‘ही वाढ आपण इथेच थांबवली नाही, तर करोनाच्या देशव्यापी उद्रेकाची परिस्थिती निर्माण होईल’, असे सांगून ती थांबवण्यासाठी जलद व निर्णायक पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासह इतर उपाययोजना करण्याचे मुख्यमंर्त्यांना आवाहन करतानाच, करोना संसर्गाच्या कमी फैलावामुळे यापूर्वी ‘सुरक्षित क्षेत्रात’ असलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील अनेक शहरांमध्येही आता पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे, याचा मोदी यांनी उल्लेख केला. बहुतांश खेडी करोनापासून मुक्त असणे हे या महासाथीविरुद्धच्या भारताच्या ‘यशस्वी’ लढ्याचे कारण आहे; आणि आता हा संसर्ग लहान शहरांमध्येही पसरला, तर ग्रामीण भागही प्रभावित होईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
वाचा- महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे कसले संस्कार; भाजपा मुख्यमंत्र्यांचं विधान