पावसामुळे देवगड हापूस आंबा बागायतदारांच्या अडचणीत वाढ
शेवटच्या टप्प्यातील १५ टक्के आंब्याचे नुकसान
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सतत चार दिवस पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे देवगड हापूस आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे शेवटच्या टप्प्यात असलेला देवगड हापूस आंबा खराब व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चाकरमान्यांची वर्दळ वाढली आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे चाकरमान्यांना आंबा चाखायला मिळण्यापासून निराशा होणार आहे. त्याचप्रमाणे देवगड हापूस आंबा बागायतदार देखील आर्थिक संकटामध्ये सापडले आहेत.
सध्या बाजारात १००० ते १८०० रुपये आंब्याच्या पेटीचा दर असून कॅनिंगला ४० ते ४५ रुपये दर मिळत आहे. पावसामुळे शेवटच्या टप्प्यातील १५ टक्के आंब्याचे नुकसान झाले असल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे. आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून, तयार आंबा काढण्यासाठी बागायतदारांची लगबग सुरू आहे. सध्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडावर असलेले आंबे जमिनीवर पडले. शेवटच्या टप्प्यातला आंबा असल्यामुळे बागायतदारांना चार पैसे अधिकचे मिळणार होते मात्र या अवकाळी पावसामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जमिनीवर आंब्याचा सडा पडला होता. ठिकठिकाणी आंब्याची झाडे, फांद्या तुटल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील आंबा काढण्यात बागायतदारांना यश आले. पण शेवटच्या टप्प्यातील झाडावर असलेल्या १५ टक्के आंब्याचे मात्र नुकसान झाले आहे. यावर्षी नैसर्गिक संकटाचा परिणाम झाला तरी बागायतदारांनी कष्टाने आंबा पीक वाचविले. आंबा उत्पादन चांगले होते परंतु दर गडगडल्यामुळे बागायतदार आर्थिक संकटात होते. त्यातच शेवटच्या टप्प्यातील आंबा येत्या आठ, दहा दिवसात तयार होईल यासाठी बागायतदार प्रतीक्षेत होते. मात्र वारा व पावसामुळे आंबा जमिनीवर आल्याने बागायतदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी बागेतील झाडे उन्मळून पडली तसेच झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. यामुळे बागायतदारांचे दुहेरी नुकसान झाले आहे.