कोल्हापूरच्या निकालावर पवार बोलले; भाजपला हाणला सणसणीत टोला
![Pawar spoke on Kolhapur verdict; The BJP was defeated](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Sharad-Pawar-कोल्हापूरच्या-निकालावर-पवार-बोलले-भाजपला-हाणला-सणसणीत-टोला.jpg)
जालना:कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला. महाविकास आघाडीच्या ऐक्यापुढे भाजपचं बळ कमी पडलं आणि भाजपचे सत्यजीत कदम यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली असून त्यांनी भाजपच्या राज्यातील नेतृत्वाला त्यांनी सणसणीत टोला हाणला आहे. ( Sharad Pawar On Kolhapur North Bypoll Results )
राज्यातील महाविकास आघाडी सरकार विकास हा समान धागा घेऊन पुढे चालले असल्याकडे लक्ष वेधत पवार यांनी कोल्हापूरच्या निकालातील नेमकेपणा सांगितला. ‘प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य लोकांना संधी द्यावी लागते. कोल्हापूर येथेदेखील असंच झालं. कोल्हापूरला विधानसभेची एक जागा रिकामी होती आणि त्याठिकाणी योग्य व्यक्तीला संधी दिली गेल्याने राज्य सरकारच्या विचाराचा आमदार लोकांनी निवडून दिला. आता सरकारवर ज्या जनतेने विश्वास दाखवला आहे त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे पवार म्हणाले. येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते.
दरम्यान, शरद पवार यांच्या कार्यक्रमाच्या वेळी एका शेतकऱ्याने व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्याला रोखले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे. पवारांना भेटण्यासाठी तो जात होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सरसकट उसाची लागवड नको
सरसकट उसाची लागवड करू नका. त्यासोबत सोयाबीन, कापूस अशी पिके शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजेत. संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस निर्मिती होत असल्याने उसाच्या गाळपाचा प्रश्न भेडसावत आहे. राज्य सरकारर्फत हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. उसाच्या शेवटच्या टिपराचे गाळप करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे यावेळी पवार म्हणाले. इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी इथेनॉल हा पर्याय असून, या निर्मितीमुळे शेतकऱ्यांना निश्चितच अधिक रक्कम मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यावर सरकारचा भर आहे. अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्यांनी निराश होऊ नये. ज्या कारखान्याचे गाळप बंद झाले आहे, त्यांचा ऊस गाळप सुरू असणाऱ्या कारखान्यात आणला जाईल,’ असे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यावेळी म्हणाले. ‘समर्थ सहकारी साखर कारखान्याने केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे कारखान्याला विविध ३० पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, येत्या काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखान्यामार्फत काम करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले . ज्ञानेश्वर उबाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर उपाध्यक्ष उत्तम पवार यांनी आभार मानले. पवार यांच्या हस्ते अंबड तालुक्यातील शेवगा फाटा येथे एका फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने उभारण्यात आलेल्या वेअर हाउसचा लोकार्पण सोहळा पार पडला.