2019 नंतर पंतप्रधानपदासाठी “नो व्हेकेन्सी’- नक्वी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Mukhtar-Abbas-Naqvi-.jpg)
पणजी – 2019 नंतर पंतप्रधानपदासाठी “व्हेकेन्सी नाही’. भाजप प्रणित आघाडीचे सरकार लोकसभा निवडणूकीनंतरही सत्तेवर कायम असेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केला आहे. मोदी विरोधी आघाडीमध्ये पंतप्रधानपदासाठी सुमारे दोन डझन इच्छुक उमेदवार आहेत. मात्र हे स्थिरता देण्यास सक्षम असणार नाहीत, असा दावा नक्वी यांनी केला.
काही राजकीय गटांकडून केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा विकास, शांतता आणि समृद्धीचा अजेंडा अस्थिर करण्यासाठी अल्पसंख्यांकांच्या मनामध्ये भय उत्पन्न केले जात आहे, असा आरोपही नक्वी यांनी केला. देशातील अल्पसंख्य सुरक्षित आहेत आणि त्यांचे हक्कही सुरक्षित आहेत. देशातील जनता मोदींच्या विकासाच्या अजेंड्यासोबत आहेत. मात्र काही जण या विकासाला बाधा आणू पाहत आहेत, असे नक्वी म्हणाले. केंद्र सरकारच्या चार वर्षांच्या यशावर प्रकाश टाकण्यासाठी गोव्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. केंद्र सरकारने गेल्या चार वर्षात 5.43 लाख जणांना रोजगार दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका एकत्र घेणे हे देशवासियांच्या हिताचे आहे. म्हणूनच पंतप्रधानांनी सर्व राजकीय पक्षांना त्याबाबत विचार करण्याची विनंती केली आहे. एकत्र निवडणूका घेण्यासाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये मतैक्य असणे गरजेचे आहे.
2019 मध्ये हिंदुत्व आणि मंदिराचा मुद्दा असणार नाही
पुढील वर्षाची लोकसभा निवडणूक निव्वळ विकासाच्या मुद्दयावर लढवली जाणार आहे. हिंदुत्व किंवा राममंदिराचा कोणताही मुद्दा निवडणूकीमध्ये असणार नाही. देशातील अल्पसंख्यांकांपर्यंत कोणत्याही भेदभावाशिवाय विकास पोहोचवण्यामध्ये सरकार यशस्वी ठरले आहे. गेल्या चार वर्षात काही अपवादात्मक घटना वगळता कोणत्याही मोठ्या जातीय दंगली घडलेल्या नाहीत. ज्या घटना घडल्या तेथे सरकारने समाजकंटकांवर त्वरित कारवाई केली आहे. असेही नक्वी म्हणाले.