२०२७ पर्यंत भारतीय अब्जाधीश तिप्पट होणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/money-1-5.jpg)
नवी दिल्ली : भारत हा जगातील सर्वाधिक अब्जाधीश असणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. पुढील दशकभरात, २०२७ पर्यंत सध्या असणारी अब्जाधीशांची संख्या तिपटीने वाढणार आहे. सध्याच्या संख्येत किमान २३८ अतिउच्च नेटवर्थ असणाऱ्यांची भर पडेल, असे ‘अॅफ्राशिया बँक ग्लोबल वेल्थ मायग्रेशन रिव्ह्यू’ या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कोणत्याही व्यक्तीकडे एक अब्ज डॉलर किंवा त्यापेक्षा अधिक मत्ता (अॅसेट्स) असेल तर त्या व्यक्तीला अब्जाधीश असे संबोधले जाते. या अहवालानुसार देशात सध्या ११९ अब्जाधीश आहेत. ही संख्या २०२७पर्यंत वाढून ३५७ होईल. २०२७पर्यंत २३८ नवे अब्जाधीश तयार होणार असून चीनमध्ये या कालावधीत ४४८ अब्जाधीश तयार होतील, असाही अंदाज अहवालात व्यक्त झाला आहे.
जगभरात सध्या २,२५२ अब्जाधीश आहेत. २०२७पर्यंत जगभरात ३,४४४ अब्जाधीश होतील. खासगी किंवा वैयक्तिक संपत्तीचे मोजमाप केल्यास भारताचा क्रमांक जगातील सर्वाधिक श्रीमंत देशांमध्ये आठवा लागतो आहे. भारताची एकूण संपत्ती ८,२३० अब्ज डॉलर इतकी आहे. त्याचवेळी जागतिक संपत्तीत पुढील दशकभरात ५० टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे २०२७ पर्यंत ही संपत्ती ३२१ लाख कोटी डॉलरवर जाईल, असे भाकित अहवालात करण्यात आले आहे. श्रीलंका, भारत, व्हिएतनाम, चीन, मॉरिशस या वेगाने संपत्ती निर्मिती करणाऱ्या बाजरपेठा ठरल्या आहेत.