हज यात्रेकरुंच्या ‘जम जम’पाण्यावर बंदी नाही, एअर इंडियाचं स्पष्टीकरण
सरकारी विमान सेवा पुरवणाऱ्या एअर इंडियाकडून हज यात्रेकरुंच्या पवित्र जम जम पाण्यावर बंदी घालण्यात आलेली नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. हज यात्रेकरु यात्रेवरुन परतताना त्यांच्या सामानासह पवित्र जम जम पाणी कॅनमधून घेऊन जाऊ शकतात असं एअर इंडियाने स्पष्ट केलं आहे.
यापूर्वी इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाने, एअर इंडियाच्या जेदाह-हैदराबाद-मुंबई आणि जेदाह-मुंबई या दरम्यान उडणाऱ्या विमानांमध्ये 15 सप्टेंबरपर्यंत जम जम पाणी आणण्यास बंदी घालण्यात आल्याचं वृत्त दिलं होतं. विमानांमध्ये झालेला बदल आणि मर्यादित आसन संख्या यामुळे जम जम पाण्यासाठी लागणारे कॅन पुरवता येणार नाही असं परिपत्रक 4 जुलै 2019 रोजी एअर इंडियाच्या जेदाह येथील कार्यालयातून जारी करण्यात आल्याचं या वृत्तात म्हटलं होतं. मात्र, असा कोणताही निर्णय घेण्यात आलं नसल्याचं स्पष्टीकरण एअर इंडियाकडून देण्यात आलं असून वृत्तसंस्था एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
यंदा भारतीय मुस्लिमांच्या हज कोट्यामध्ये 30 हजारांची वाढ करण्यात आली असून दरवर्षी २ लाख भाविकांना आता हज यात्रा करता येणार आहे. गेल्या महिन्यात जी 20 समिटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि सौदीचा युवराज मुहम्मद बिन सलमान यांच्यामध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर भारतीय मुस्लिमांच्या हज कोट्यामध्ये 30 हजारांची वाढ करण्यात आली असून दरवर्षी 2 लाख भाविकांना आता हज यात्रा करता येणार आहे.