सीमेवरील घुसखोरीचे प्रमाण ४३ टक्क्यांनी घटले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/ray-new.jpg)
भारत – पाकिस्तान सीमेवरील घुसखोरीचे प्रमाण ४३ टक्क्यांनी कमी झाले असल्याचा दावा मंगळवारी गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत केला. यावेळा राय यांनी म्हटले की, सीमारेषेवरील घुसखोरी रोखण्यासाठी सरकारकडून अंमलात आणल्या जात असलेल्या झिरो टॉलरन्स पॉलिसीचे परिणाम आता दिसत आहेत.
जवानांकडून केल्या जाणाऱ्या ठोस कारवाईमुळे व सरकारकडून भारत-पाकिस्तान सीमा रेषेवर विद्युत कुंपण घालण्यात आल्याने देखील २०१८ च्या तुलनेत यंदा जून महिन्यापर्यंत घुसखोरीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे, असे राय यांनी सांगितले.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तान संबंधात मोठा तणाव निर्माण झाला होता. शिवाय सीमारेषेवरही सुरक्षा व्यवस्था अधिकच वाढवण्यात आली होती. मोदी सराकारद्वारे पहिल्या कार्यकाळात सीमेवर विद्युत कुंपण घालण्याचे काम करण्यात आले होते. यामुळे देखील घुसखोरीचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली असल्याचे सांगितले गेले आहे.