शिवसेनेच्या बुरखा बंदीच्या मागणीला भाजपाचा विरोध
देशभरात सार्वजनिक ठिकाणी बुरखा बंदी करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला भाजपाचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विरोध केला आहे. भारतात बुरखा बंदी करण्याची गरज नाही असे नरसिम्हा राव म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा शिवसेनेच्या बुरखा बंदीच्या मागणीवर असहमती दर्शवली. बुरखा घालणाऱ्या सर्व महिला दहशतवादी नसतात असे ते म्हणाले.
शिया वक्त बोर्डाचे चेअरमन वसीन रिझवी यांनी सुद्धा शिवसेनेच्या बुरखा बंदीच्या मागणीला विरोध केला आहे. ही बेजबाबदार आणि असंवैधानिक मागणी आहे. बुरखा घालायचा की नाही हा निर्णय मुस्लिम महिलांवर सोडला पाहिजे असे ते म्हणाले.
काय म्हटले आहे शिवसेनेच्या अग्रलेखात
सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करुन श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस आणि धैर्याचे दर्शन घडवले असून रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार?, असा सवाल उपस्थित करतानाच भारतातही बुरखाबंदी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
श्रीलंकेत भीषण बॉम्बस्फोट झाले असले तरी भारतालाही याचे हादरे बसत आहे. जम्मू आणि कश्मीरलाही दहशतवादाने ग्रासले आहे. श्रीलंका, फ्रान्स आणि ब्रिटनसारखे देश कठोर पावले उचलत असतानाच आपण तशी पावले कधी उचलणार?, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. विद्यमान मोदी सरकारने तिहेरी तलाकविरोधात कायदा आणला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून भारतातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.