रोजगार निर्मितीच्या फुग्याला टाचणी!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/Untitled-1-38.jpg)
- ‘ईपीएफओ’च्या आकडेवारीनुसार प्रत्यक्षात पाच लाख नोकरदार घटले
देशात मोठय़ा प्रमाणात रोजगारात वाढ झाल्याचा दावा केंद्र सरकारने ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थे’कडील (ईपीएफओ) आकडेवारीच्या आधारावर केला होता. मात्र सप्टेंबर-मे या महिन्यांत नोंदीकृत कर्मचाऱ्यांच्या, निवृत्तीवेतनधारकांच्या संख्येत १२.४ टक्के घसरण झाल्याचे या संस्थेच्याच सुधारित ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. म्हणजेच नोकरदारांच्या संख्येत पाच लाख ५४ हजारांनी घट झाल्याचे स्पष्ट होत आहे.
सप्टेंबर ते जून या कालावधीत ‘ईपीएफओ’कडील कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांची संख्या सर्वाधिक म्हणजे ४७ लाख १३ हजारांनी वाढली होती. त्यामुळे ही नवी रोजगार निर्मिती असल्याचा दावा करीत सरकारने संसदेत आणि संसदेबाहेर विरोधकांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. ‘ईपीएफओ’ची आकडेवारी ही नव्या रोजगार निर्मितीचा पुरावा ठरू शकत नाही, असा विरोधकांचा आक्षेप होता. आता मात्र ‘ईपीएफओ’ने आपल्या आकडेवारीत सुधारणा केली आहे. त्यानुसार सप्टेंबर ते जून या कालावधीत नोंदीकृत कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांची संख्या ४७ लाख १३ हजार नव्हे, तर ३९ लाख २० हजार असल्याचे उघड झाले आहे.
‘ईपीएफओ’ने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या दहा महिन्यांत जून महिन्यात नवीन कर्मचाऱ्यांची सर्वाधिक नोंद झाली. सात लाख ९३ हजार ३०८ सदस्य एवढी ही संख्या होती. त्यातील दोन लाख ५३ हजार ४६६ हे १८ ते २१ या वयोगटातील होते. त्यानंतर दोन लाख पाच हजार १७७ हे २२ ते २५ या वयोगटातील होते. अर्थात या आकडेवारीत हंगामी कर्मचाऱ्यांचाही समावेश असू शकतो, असे ‘ईपीएफओ’ने स्पष्ट केले आहे. म्हणजेच वर्षभर त्यांची संख्या कायम राहीलच असे नाही.