‘राजीव गांधी भ्रष्टाचारी नव्हते, मोदींच्या आरोपात तथ्य नाही’, भाजपा नेत्याचा घरचा आहेर
![#Lockdown: NCP criticizes Modi for calling lockdown a last resort; Said](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/images_1537356171862_narendra_modi.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर जोरदार टीका करत आहेत. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींचा उल्लेख केला असून भ्रष्टाचारी असा आरोप केल्याने वाद निर्माण झाला आहे. एकीकडे काँग्रेस नेते नरेंद्र मोदींच्या आरोपांना उत्तर देत असताना कर्नाटकमधील काँग्रेस नेत्याने आपण नरेंद्र मोदींशी सहमत नसल्याचं सांगितलं आहे. कर्नाटकमधील भाजपा उमेदवार व्ही के प्रसाद यांनी नरेंद्र मोदींनी केलेला आरोप अत्यंत चुकीचा असल्याचं म्हटलं आहे.
‘राजीव गांधींच्या हत्येचा कट आखण्यात आला होता. भ्रष्टाचारामुळे त्यांचा मृत्यू झालेला नाही. कोणाचाही त्यावर विश्वास बसणार नाही. माझाही यावर विश्वास नाही. मी नरेंद्र मोदींचा खूप आदर करतो, पण राजीव गांधींविरोधात बोलण्याची गरज नव्हती’, असं त्यांनी म्हटलं आहे.
व्ही के प्रसाद हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री होती. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि राज्यमंत्री झाले होते. २०१७ मध्ये ते पुन्हा भाजपात परतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना राजीव गांधी यांचा भ्रष्टाचारी नंबर १ म्हणून शेवट झाला अशी टीका केली होती.
‘नरेंद्र मोदींच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. मी राजीव गांधींना अत्यंत जवळून ओळखत होतो. देशातील कोणीही मोदींच्या आरोपांशी सहमत होणार नाही. त्यांनी ते वक्तव्य करायला नको होतं’, असं व्ही के प्रसाद यांनी म्हटलं आहे. राजीव गांधी यांना मिस्टर क्लीन म्हणून ओळखलं जायचं असंही ते म्हणाले आहेत. ‘तरुण वयात त्यांच्यावर पंतप्रधानपदाची मोठी जबाबदारी पडली होता. त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली’, असं व्ही के प्रसाद यांनी सांगितलं.