मोदींवर काँग्रेस आमदाराची आक्षेपार्ह टीका
सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. मात्र, एकमेकांवर टीका करताना नेत्यांची जीभ घसरताना दिसत आहे. कर्नाटकातील काँग्रेस आमदार बी नारायण राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नामर्द असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे.
बिदर जिल्ह्यातील काँग्रेस आमदार बी नारायण राव यांनी सोमवारी कलबुर्गी येथील प्रचार सभेत मोदींवर टीका केली. मात्र टीका करताना त्यांना भान राहिले नाही आणि त्यांनी बेताल विधान करून नाव वाद निर्माण केला. नरेंद्र मोदी नामर्द आहेत, त्यांचे लग्न लावता येईल पण त्यांच्याकडून पूत्रप्राप्ती होणार नाही, असे बेताल विधान त्यांनी केले. मोदी हे काम करणारे पंतप्रधान नाही, ते खोटे बोलणारे पंतप्रधान आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली. कलबुर्गी येथे राहुल गांधी यांनी सोमवारी सभा घेतली. याच सभेत राहुल गांधी यांच्या आगमनापूर्वी बी नारायण राव यांनी हे वादग्रस्त विधान केले.
यापूर्वी तेलंगणातील काँग्रेस नेत्या विजय शांती यांनी देखील मोदींचा उल्लेख दहशतवादी असा केला होता. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेत त्यांनी हे विधान केले होते. जनतेमध्ये मोदिंविषयी भीती आहे. मोदी कधी कोणता बॉम्ब फेकतील याचा आंदाज नाही, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेत्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर भाजपाने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.