मुली शाळेत जाऊ लागल्यानेच अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ, डीजीपींचं वक्तव्य; लोकांमध्ये संताप
मुली किंवा महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांसाठी समाजाकडून अनेकदा महिलांनाच जबाबदार ठरवलं जातं. पण त्यांच्याविरोधातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी कोणी प्रयत्न करताना दिसत नाही. अशा परिस्थितीत महिलांना सुरक्षित वाटावं ही जबाबदारी पुर्णपणे पोलिसांची असते. पण पोलीस महानिरीक्षकांनी केलेल्या वक्तव्यामुळे महिलांच्या सुरक्षेप्रती पोलीस किती गंभीर आहेत याबाबत प्रश्चचिन्ह निर्माण होत आहे. मध्य प्रदेशचे पोलीस महानिरीक्षक व्ही के सिंग यांनी मुली शाळेत जाऊ लागल्यानेच अपहरणांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा अजब तर्क लावला असून त्यांच्या या धक्कादायक वक्तव्याविरोधात लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
व्ही के सिंग यांना मध्य प्रदेशातील वाढत्या अपहरण आणि बलात्काराच्या घटनांसंबंधी विचारण्यात आलं होतं. यासंबंधी बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘सध्या आयपीसी ३६३ च्या रुपाने नवा ट्रेंड सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. मुली शाळा आणि कॉलेजात जाऊ लागल्याने स्वतंत्र होऊ लागल्या आहेत. हा एक मह्त्त्वाचा मुद्दा असून कारणीभूत आहे. जेव्हा मुली घराबाहेर पडतात तेव्हाच सर्वात जास्त अपहरणांच्या घटनांची नोंद होते’.
नुकतंच मध्य प्रदेशात एका आठ वर्षांच्या मुलीची बलात्कार करुन हत्या करण्यात आली आहे. मुलगी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास काही सामान खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती. बराच वेळ झाला तरी मुलगी न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरु केला होती आणि पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांना घराजवळच मुलीचा मृतदेह सापडला होता. बलात्कार केल्यानंतर गळा दाबून मुलीची हत्या करण्यात आल्याचं शवविच्छेदन अपहवालात स्पष्ट झालं होतं.
एका रिपोर्टनुसार, मध्य प्रदेशात २०१६ मध्ये मुलांच्या अपहरणांच्या ६०१६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. एनसीआरबीनेही या आकडेवारीला दुजोरा दिला आहे. व्ही के सिंग हे १९८४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांनी डीजीपी पदाचा कार्यभार स्विकारला.