मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच येडियुरप्पांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/yeddyurappa-1-1.jpg)
बंगळूरू : कर्नाटक विधानसभेत बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज राज्यातील १ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे काँग्रेस-जेडीएसच्या काही आमदाराचं चित्त विचलित होऊ शकतं आणि ते वेगळा विचार करू शकतात, अशी आशा कदाचित भाजपाला वाटते.
भाजपाच्या या खेळीमुळे कॉंग्रेस आणि जेडीएसची चिंता अधिक वाढली आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी फोडाफोडीच्या घोडेबाजाराला निकाल लागताच सुरुवात झाली होती. परंतु कॉंग्रेस आणि जेडीएसने एकत्र येत भाजपाला सत्ता स्थापनेपासून दूर ठेवले होते. मात्र, राज्यपालांनी भाजपाला संधी देताच, येडियुरप्पांनी आज सकाळी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आता पुढच्या १५ दिवसांत त्यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
येडियुरप्पांनी आपलं सरकार पाच वर्षं पूर्ण करेल, असं त्यांनी अगदी ठामपणे सांगितलंय. हे सांगतानाच, त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या विषयाबाबत सरकारची भूमिकाही मांडली. आपलं सरकार १ लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेल, असं त्यांनी जाहीर केलं आहे. पुढच्या एक-दोन दिवसांत याबाबतची औपचारिक घोषणाही ते करणार आहेत. या निर्णयातून त्यांनी शेतकऱ्यांबद्दल आस्था असलेल्या काँग्रेस-जेडीएसमधील आमदारांना अप्रत्यक्षपणे साद घातली आहे.