महाराष्ट्रानंतर शेतकऱ्यांचा दिल्लीतही लॉंग मार्च
नवी दिल्ली – अखिल भारतीय किसान सभेकडून (एआयकेएस) देशाची राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचा लॉंग मार्च काढला जाणार आहे. शेतीविषयक समस्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी ते पाऊल उचलले जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लॉंग मार्च काढला. तो यशस्वी ठरल्याने त्याची पुनरावृत्ती दिल्लीत करण्याचा निर्णय येथे झालेल्या किसान सभेच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांचा दिल्लीतील लॉंग मार्च 5 सप्टेंबरनंतर होण्याची शक्यता आहे. त्याविषयीचा कार्यक्रम व्यापक चर्चेनंतर जाहीर केला जाणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील एनडीए सरकार स्वतंत्र भारतातील सर्वांत शेतकरीविरोधी आणि कामगारविरोधी सरकार आहे.
त्या सरकारमुळे शेतीविषयक अभूतपूर्व समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याची परिणती लाखों कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ग्रामीण बेरोजगारीत वाढ आदींमध्ये झाली आहे, असा आरोप किसान सभेने केला आहे.