पॅन्गाँग सरोवराजवळ संघर्ष: चीनने सैन्याची कुमक वाढवली, रणगाडे तैनात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/india-china-2.jpg)
बीजिंग – काही दिवसांपूर्वी लडाख पूर्व भागातील पॅन्गाँग त्सो सरोवर भागात भारतीय जवानांनी चिनी सैन्याच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला. त्यानंतर आता चीनने या भागात सैन्याची कुमक वाढवली असून रणगाडेही तैनात केले आहेत. भारतीय सैन्यासोबत होत असलेल्या संघर्षाच्या पॉईंट्सवर चीन आपली स्थिती आणखी भक्कम करत आहे. त्याशिवाय या भागात नवीन पोस्ट उभारत असल्याचे समोर आले आहे.
‘टेलीग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि चीन दरम्यानचा तणाव निवळण्याची स्थिती दिसत नाही. दोन दिवसांपूर्वी मॉस्कोमध्ये भारत आणि चीनच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये तणाव कमी करण्यासाठी चर्चा झाली होती. भारतासोबत पुन्हा संघर्ष उद्भवू शकतो अशा ठिकाणी अधिक सैन्य आणि रणगाडे तैनात करत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि चीनचे जवळपास एक लाख सैन्य लडाख पूर्व भागात तैनात आहेत. चर्चेतून तणाव कमी होईल अशी आग्रही भूमिका चीन मांडत असला तरी जमिनीवर परिस्थिती वेगळी आहे. चीन या भागात आपले सैन्य अधिकच बळकट करत आहे.
याआधी २९-३० ऑगस्टच्या मध्यरात्री चीनच्या सैन्याने पॅन्गाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याकडील भागात घुसखोरी करून प्रत्यक्ष नियंत्रण ताबा रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी चीनचा हा डाव उधळून लावला. इतकंच नव्हे तर भारतीय सैन्याने या डोंगराळ भागातील प्रमुख ठिकाणांवर ताबा मिळवला.
दरम्यान, भारत आणि चीनमधील सीमावादावर ( india china border dispute ) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंगे यांच्यात शुक्रवारी रशियामध्ये दोन तासांहून अधिक वेळ बैठक चालली. या बैठकीनंतर चीनने एक निवेदन जारी केले. या निवेदनात चीनने भारताविरोधात गरळ ओकली असून तणावाला भारत जबाबदार असल्याचे वक्तव्य केले आहे. चीन-भारत सीमेवरील सध्याच्या तणावाला पूर्णपणे भारत जबाबदार आहे, हे सत्य समोर आलं आहे. चीन आपली एक इंच जमीनही सोडू शकत नाही. चीनचे सैन्य त्याच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचं आणि प्रादेशिक अखंडतेचं संरक्षण करण्यासाठी पूर्णणे कटिबद्ध आणि सक्षम आहे, असं म्हणत चीनने उलट्या बोंबा ठोकल्या आहेत.