पाच वर्षात तीन एअर स्ट्राइक केले पण तिसऱ्याची माहिती देणार नाही – राजनाथ सिंह
मागच्या पाच वर्षात तीन वेळा भारतीय सैन्यदलाने सीमा ओलांडली व परदेशी भूमीवर जाऊन यशस्वीरित्या एअर स्ट्राइक केला. मी दोन स्ट्राइकबद्दल बोलेन तिसऱ्याबद्दल काही सांगणार नाही असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी केले. कर्नाटकात एका सभेमध्ये ते बोलत होते.
मागच्या पाचवर्षात तीन वेळा आपण सीमा ओलांडली व आपल्या सैन्य दलांनी यशस्वी एअर स्ट्राइक केला. मी तु्म्हाला दोन स्ट्राइकची माहिती देईन. तिसऱ्याबद्दल काही सांगणार नाही असे राजनाथ म्हणाले. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर २०१६ मध्ये भारतीय सैन्याने केलेला सर्जिकल स्ट्राइक आणि बालकोटमधल्या एअर स्ट्राइकचा दाखला त्यांनी दिला.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानातील बालकोटमधील जैश-ए-मोहम्मदचा तळ एअर स्ट्राइकमध्ये उद्धवस्त केला. त्याआधी उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे लाँच पॅड उद्धवस्त केले. एअर स्ट्राइकच्या तिसऱ्या घटनेबद्दल मी तुम्हाला सांगणार नाही असे राजनाथ यांनी सांगताच जमलेल्या गर्दीने टाळयांचा कडकडाट केला.