पाकिस्तानचा पोकळ राग! २७ फेब्रुवारी विसरु नका
पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला पोकळ राग दिला आहे. भारताने दाखवलेल्या आक्रमकतेला आम्ही २७ फेब्रुवारीला चोख प्रत्युत्तर दिले. आम्ही पुन्हा एकदा असे करु शकतो असे पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राकडून जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरु असताना पाकिस्तानाने त्यांच्या भूमीवर एकही दहशतवादी संघटना कार्यरत नसल्याचा दावा केला आहे. मसूद अझहर पाकिस्तानात असून तिथूनच तो आपले दहशतवादाचे नेटवर्क चालवतो. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते असीफ गफूर यांनी उलटा भारतावरच आरोप केला आहे.
भारताची गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ पश्तून चळवळीला खतपाणी घालत असून पैसे पुरवत असल्याचा आरोप केला आहे. भारताने दाखवलेल्या आक्रमकतेला आम्ही २७ फेब्रुवारीला चोख प्रत्युत्तर दिले. आम्ही पुन्हा एकदा असे करु शकतो. मागच्या दोन महिन्यांपासून भारत सातत्याने खोटे बोलत आहे असा आरोप त्यांनी केला. हे १९७१ नाही हे भारताने लक्षात घ्यावे. १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव करुन बांगलादेशची निर्मिती केली होती.
बालाकोट एअर स्ट्राइकनंतर जे काही घडले ते सत्य भारताने उघड करावे असे आव्हान त्यांनी दिले. पाकिस्तानच्या काऊंटर स्ट्राइकमध्ये काय घडले ते सर्व भारताने जाहीर केलेले नाही असा गफूर यांनी दावा केला आहे. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी यंत्रणेने मार्चमध्ये ६९ दहशतवादी संघटनांवर बंदी घातली. हिजबुल मुजाहिद्दीन, हरकत उल मुजाहिद्दीन आणि अल बादर यासारख्या पाकव्याप्त काश्मीरमधून चालणाऱ्या संघटनांवर बंदी घातलेली नाही. पाकिस्तानने बंदीचे हे नाटक केले असले तरी हाफिज सईद आणि मसूद अझहर हे दहशतवादी तिथे मुक्तपणे वावरत आहेत.