पतीला भेटू दिले जात नाही केजरीवालांच्या पत्नीची तक्रार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/sunita-kejariwal.jpg)
नवी दिल्ली – दिल्लीच्या राज्यपालांच्या निवासस्थानी धरणे धरून बसलेले, मुख्यमंत्री अरविंद केजरवाल यांना आपल्याला भेटू दिले जात नसल्याची तक्रार केजरीवालांच्या पत्नीने केली आहे. केवळ आपणच नव्हे तर तेथे जे अन्य मंत्री धरणे धरून बसले आहेत त्यांच्या पत्नींनाहीं त्यांना भेटू दिले जात नाही असे सुनीता केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे की देशात कारागृहात असलेल्या कैद्यांनाही भेटण्याची त्यांच्या नातेवाईकांना अनुमती दिली जाते पण आमच्या मुख्यमंत्री असलेल्या पतीलाही भेटण्यास अनुमती मिळत नाहीं ही भीषण बाब आहे.
सुनीता केजरीवाल यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की काल आपण आपल्या सासुबाई, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या पत्नी तसेच आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या पत्नी असे एकत्रितपणे राज्यपालांच्या निवासस्थान गेलो होतो पण आम्हाला त्यांना भेटू दिले नाही. राज्यपालांना आम्हा चार बायकांकडून काय धोका होता? असा सवाल केजरीवालांच्या पत्नीने उपस्थित केला असून आपल्याला प्रत्येकाकडूनच धोका आहे असा समज राज्यपालांनी करून घेऊ नये असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान या संबंधात राज्यपालांच्या कार्यालयाने असे म्हटले आहे की राज्यपालांच्या निवासस्थानाच्या बाहेर मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री आपल्या कुटुंबियांना भेटू शकतात त्याबाबतीत त्यांच्या कोणतेही निर्बंध लागू नाहीत. दरम्यान आम आदमी पक्षाच्या या कृतीला विरोध म्हणून भाजपचे खसदार प्रवेश साहिबसिंग वर्मा आणि तीन आमदार मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयतील कार्यालयाबाहेर धरणे धरून बसले आहेत. त्यांनी तेथे मोठी फलकबाजीही केली आहे पण हे फलक काढून टाकण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.