‘ना हार मे, ना जीत मे, किंचित नही भयभीत मै’, शिवराज सिंह चौहान यांचा 15 वर्षांनी राजीनामा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Shivraj-Singh-Chauhan.jpg)
मध्य प्रदेशात बहुमत न मिळाल्याने आपण सत्तास्थापनेचा दावा करणार नाही असं सांगत शिवराज सिंह चौहान यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. शिवराज सिंह चौहान यांना तब्बल 15 वर्षानंतर राजीनामा द्यावा लागला आहे. स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार नाही, असं स्पष्ट करत शिवराज सिंह राजीनाना देण्यासाठी राज्यपालांकडे निघाले. प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली असता, आता आपण मुक्त झालो असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘आता आपण मुक्त झालो आहोत. मी राज्यपालांकडे राजीनामा सोपलला आहे. पराभवाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. मी कमलनाथ यांना शुभेच्छा दिल्या आहेत’, असं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी एक कविता म्हणत आपली परिस्थिती सांगितली. ‘ना हार मे, ना जीत मे, किंचित नही भयभीत मै, कर्तव्य पथ पर जो भी मिले, ये भी सही वो भी सही’, असं ते म्हणाले.
मध्य प्रदेशात काँग्रेसने दमदार कामगिरी करत भाजपाला धक्का दिला. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या प्रतिमेवर भाजपा अवलंबून होता. पण शिवराज सिंह चौहान यांना हा गड राखता आला नाही. २३० जागांपैकी काँग्रेसला ११४ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपाला १०९ जागांवर विजय मिळाला आहे. अपक्ष उमेदवार ४ जागांवर निवडून आले असून बहुजन समाज पक्षाला २ आणि समाजवादी पक्षाला एका जागेवर विजय मिळाला आहे. मध्य प्रदेश विधानसभेत सत्तास्थापनेसाठी ११६ ची मॅजिक फिगर गाठणे आवश्यक आहे. मात्र, एकाही पक्षाला ही मॅजिक फिगर गाठता आली नव्हती. काँग्रेस बहुमतापासून २ जागा दूर आहे. तर भाजपाला सत्तास्थापनेसाठी आणखी सात आमदारांचे पाठबळ हवे होते. त्यामुळे घोडेबाजार तेजीत येण्याची शक्यता होती.
मात्र, शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेत सत्ता स्थापनेसाठी दावा करणार नाही, असे स्पष्ट केले. आम्हाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करणार नाही, आम्हाला जनादेश मान्य आहे, मी पत्रकार परिषदेनंतर राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करणार, असे त्यांनी सांगितले. या पराभवाची जबाबदारी माझी असून मतांची टक्केवारी जास्त असूनही आम्ही संख्याबळात कमी पडलो, असे त्यांनी नमूद केले.
शिवराज सिंह यांनी सत्तास्थापनेसाठी दावा न करण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसचा मार्क मोकळा झाला आहे. बहुजन समाज पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिला असून यामुळे काँग्रेसला ११६ ची मॅजिक फिगर गाठण्यात यश आले आहे. समाजवादी पक्षानेही काँग्रेसला पाठिंबा दिल्याने काँग्रेसकडील संख्याबळ ११७ इतके झाले आहे.