नाशिकच्या पोलीसाने बाटलीतून फुलवली बाग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/plastic-bottal-plantation.png)
नाशिक : लॉकडाऊनदरम्यान आपापल्या राज्यात जाणाऱ्या अनेक परप्रांतीय नागरिकांना नाशिककरांनी मदत केली. अनेकांनी अन्नदान केलं, काहींनी पाणी दिलं तर काहींनी औषधं पुरवले. या दरम्यान रस्त्यावर प्लास्टिकच्या बाटल्यांचा मोठा खच पडला. मात्र, या बाटल्यांमध्ये वृक्षरोपण करुन नाशिकच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने नवा आदर्श उभा केला आहे.
लॉकडाऊनदरम्यान मुंबईहून हजारो परप्रांतीय नागरिक नाशिकमार्गे पायी आपापल्या राज्यात परतले. या परप्रांतीयांनी नाशिकच्या रस्त्यांवरुन प्रवास करताना पिण्याच्या पाणीच्या अनेक प्लास्टिकच्या बाटल्या फेकल्या. नाशिक वाहतूक विभागाच्या सचिन जाधव या कर्मचाऱ्याने या बाटल्या गोळा करुन त्यामध्ये वृक्षरोपण केले.
सचिन जाधव यांनी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये विविध फुले आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं लावली. त्यांनी या बाटल्या आपल्या पोलीस चौकी बाहेरील बॅरिकेट्सला लावून वनस्पतींची एक बागच फुलवली आहे. त्यांच्या या कामाचं सर्वच स्तरावरुन कौतुक केलं जात आहे.
![](https://dg2xa75eep0la.cloudfront.net/wp-content/uploads/2020/06/01170012/police-plantation.jpg)
“परप्रांतीय नागरिकांना अनेकांनी मदत केली. मात्र, त्यानंतरचा रस्त्यावरील कचरा साफ कसा करायचा? या विचारातून ही संकल्पना सुचली”, असं सचिन जाधव यांनी सांगितलं आहे
![](https://dg2xa75eep0la.cloudfront.net/wp-content/uploads/2020/06/01170115/flower.png)
सचिन जाधव यांनी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये लावलेल्या रोपांमध्ये तुळस, अधुळस, अश्वगंधा, कोरफड यासह अनेक आयुर्वेदिक वनस्पती आहेत. सचिन जाधव यांच्या कामांची दखल नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीदेखील घेतली आहे. त्यांनी सचिन जाधव यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. याशिवाय त्यांनी जाधव यांना सर्व झाडं महामार्गावर लावण्याचं आश्वासन दिलं आहे.