नाना पटोलेंची 50 टक्के वीज बिल माफ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी
![Who blessed the criminals in Nagpur? Nana Patole's question to the government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Nana-Patole.jpg)
नागपूर : लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या कालावधीत आलेलं 50 टक्के वीज बिल माफ करावं, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
राज्यात वीज बिलाबाबत लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. लाॅकडाऊनच्या काळात तीन महिन्यातलं भरमसाठ बिल आलं आहे, त्यामुळे लोकांची नाराजी आहे. त्यामुळेच लाॅकडाऊनमध्ये तीन महिन्यात आलेलं वीज बिल निम्म्याने माफ करावं, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. . मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लॉकडाऊनच्या काळात बहुतांश जनता घरी आहे. अनेक जणांचे ‘वर्क फ्रॉम होम’ असल्यामुळे दिवसाचे नऊ-दहा तास कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि तत्सम इलेक्ट्रिक उपकरणे चालू असतात. त्यातच उन्हाळ्यात पंखे आणि एसी यांचाही वापर दिवसभर होत असल्याने वीज बिल वाढले आहे.
आधीच कोरोनात रोजगाराचं संकट, त्यात वीज बिल जास्त आल्यानं अनेकांवर मोठं संकट ओढवलं आहे. लॉकडाऊनच्या काळात विजेचा घरगुती वापर जास्त झाला आहे. शिवाय विजेचे दरही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना विजेचं बिल जास्त आलं आहे.
दुसरीकडे, विजेचा वापर झाला नसतानाही अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारले जात असल्याच्या तक्रारीही काही जण करत आहेत. त्यामुळे वीज बिल पाहूनच अनेकांना मोठा ‘शॉक’ बसला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा पटोले यांनी व्यक्त केली.