‘नकोशा’ मेसेज, कॉलपासून लवकरच होणार सुटका
कोलकाता: फोन ग्राहकांची लवकरच नकोशा कॉल आणि मेसेजपासून सुटका होणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने अशा प्रकारच्या कॉल्सवर करडी नजर ठेवण्यासाठी नियमावली तयार केली आहे. याशिवाय ग्राहकांना कोणत्या प्रकारचे मेसेज हवे आहेत, तसेच ग्राहकांकडून परवानगी मिळवण्यासाठी ‘थर्ड पार्टी’कडे प्रस्ताव ठेवला आहे.
टेलीमार्केटिंग कंपन्यांकडून ग्राहकांना पाठवण्यात येणारे मेसेज आणि केले जाणारे कॉल रोखण्यात अपयशी ठरलेल्या टेलिकॉम कंपन्यांना दंड आकारणेही ट्रायने अनिवार्य केलं आहे. एक हजार ते ४६ लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
देशातील टेलिकॉम नेटवर्कवर दर महिन्याला जवळपास ३० अब्ज नकोशे असलेले मेसेज येत असतात. ते रोखण्यासाठी आणि त्याबाबत तयार केलेल्या नियमावलीवर ‘ट्राय’ने भागधारकांकडून ११ जूनपर्यंत मते मागवली आहेत. ‘ट्राय’चे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी सांगितले, की ‘ट्रायकडून अशा प्रकारचे नियम पहिल्यांदाच लागू करण्यात आले आहेत.’