देशाच्या अर्थव्यवस्थेवर माझ्याशी चर्चा करा, चंद्राबाबूंचे पंतप्रधान मोदींना आव्हान
मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात देशाला काय फायदा झाला यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याशी चर्चा करावी असे आव्हान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी दिले आहे. मंगळवारी पंतप्रधान मोदींनी दिलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोदी सरकारच्या काळात देशाने आर्थिक वाढीचा अपेक्षित दर गाठला का असा सवाल उपस्थित केला.
नायडू म्हणाले, तत्कालीन यूपीए सरकारच्या काळातही आर्थिक वाढीचा दर चांगला नसेल. पण या सरकारच्या काळातही हा चांगला नाही. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे आर्थिक वाढ झाली का, असा सवाल त्यांनी केला. मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे देशाची आर्थिक प्रणाली उद्ध्वस्त झाल्याचा आरोप त्यांनी केला. आर्थिक मुद्यांवर मोदींनी माझ्याशी चर्चा करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
दरम्यान, नोटाबंदी हा झटका नव्हता तर आम्ही एक वर्ष आधीपासून सांगत होतो की काळ्या पैशाविरोधात कारवाई करण्यात येणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीत सांगितले. आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे दिला. त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव नव्हता असे मोदी यांनी स्पष्ट केले.