देशांतर्गत दहशतवादाचा सामना करण्यास भारत सक्षम, कोणाच्या मदतीची गरज नाही : उपराष्ट्रपती
देशांतर्गत दहशतवादाशी लढण्यासाठी आपण सक्षम आहोत, यासाठी आपल्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही. याची चुनूक भारतीय हवाई दलाने नुकतीच दाखवली आहे, असे उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांनी म्हटले आहे. ते पराग्वे येथे तिथल्या भारतीय समुदायासमोर बोलत होते.
नायडू म्हणाले, आमचे संरक्षण करण्यास आम्ही तयार आहोत, कारण पुलवामा हल्ल्यानंतर आपल्या हवाई दलाने पाकिस्तानला ज्या प्रकारे चोख प्रत्युत्तर दिलं त्यावरुन याची प्रचिती येते. या हल्ल्यामध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला केला नाही की नागरिकांवर त्यामुळे कोणालाच त्रास झाला नाही, केवळ दहशतवाद्यांना त्रास सहन करावा लागला.
मात्र, दुर्देवानं आता या हल्ल्यानंतर किती दहशतवादी मारले गेले यावर चर्चा सुरु आहेत. त्यांच्यासाठी सैन्याच्या कारवाईपेक्षा किती दहशतवादी मारले गेले हे जास्त महत्वाचे आहे. काल गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना चांगले सुचवले की, ज्यांना कोणाला या हल्ल्यांसंबंधी पुरावा हवा आहे ते पाकिस्तानला भेट देऊ शकतात. आम्हाला युद्ध नको आहे मात्र जर जाणूनबुझून कोणी आमची छेड काढली तर आम्ही त्याला सोडणार नाही, असे नायडू यावेळी म्हणाले.
नायडू म्हणाले, दहशतवाद हा मानवतावादाचा शत्रू आहे, याला कुठलाही धर्म नसतो. दहशत माजवणे हे खूपच मुर्खपणा आणि वाईटपणाचे लक्षण आहे. दहशतवाद्यांची ही जमात जगाच्या पाठीवरुन नष्ट झाली पाहिजे. मात्र, त्यासाठी दहशतवादाविरोधात जगातील सर्व नागरिकांनी एकजूट व्हायला हवं.
आपल्या शेजारील राष्ट्राने दहशतवाद हे त्यांच्या देशाचे धोरणच ठरवले आहे. हा देश या दहशतवाद्यांना अन्न, पैसा आणि शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देत आहे. मात्र, आता ते घाबरले आहेत. ते जरी सार्वजनिकरित्या दहशतवाद रोखण्याचे दावे करत असले तरी दहशतवादाला पैसा पुरवण थांबवत नाहीत, असा दावा त्यांनी केला.