दिल्लीतील हत्याकांड प्रकरणी हिंसेचे पुरावे नाहीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/burari_.jpg)
नवी दिल्ली – दिल्लीत एकाच घरातील 11 जण मृतावस्थेत सापडल्याच्या धक्कादायक घटनेनंतर पोलिस तपासाला वेग आला आहे. या सर्व 11 जणांच्या शवविच्छेदनानंतर घरामध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा झाल्याचा पुरावा उपलब्ध नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मरण पावलेल्या 11 जणांमध्ये 7 महिला आणि 2 लहान मुलांचाही समावेश आहे. घरातील 10 जण लोखंडी जाळीने गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये गूढरित्या आढळले होते. तर 77 वर्षांच्या नारायण देवी या जमिनीवर पडलेल्या आढळल्या होत्या.
दोन मुले आणि त्यांच्या आजी नारायण देवी यांचे शवविच्छेदन आता पर्यंत झाले आहे. मात्र त्यांच्याबरोबर हिंसा झाल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. नारायण देवी यांचा गळा आवळून खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज होता. मात्र डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूचे कारण “अंशतः गळफास’ हे कारण सांगितले. नारायण देवी यांच्या मृतदेहाजवळच एक दोरही पडलेला आढळून आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. नारायण देवी यांच्या गळ्यातील दोर कोणी काढला असावा, याचा शोध घेतला जात आहे.
घरातील सर्वांनी मृत्यूपूर्वीच गळफास लावून घेतले असावेत, असा प्राथमिक तपासानंतरचा अंदाज आहे. मात्र शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे. त्यानंतरच याबाबत ठोस माहिती सांगता येऊ शकेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. घरात गळफास घेतलेल्यांच्या तोंडावर चिकटपट्टी लावलेली होती. त्यांचे चेहरेही कापडाच्या तुकड्याने झाकलेले होते. केवळ नारायण देवी यांचा चेहरा झाकलेला नव्हता.
अंधश्रद्धा की आणखी काही….
धार्मिक रितीद्वारे सामुहिक आत्महत्येचाच हा प्रकार असावा, असाही अंदाज व्यक्त होत आहे. घरामध्ये सापडलेल्या हस्तलिखीत चिठ्ठ्यांद्वारे तसे सूचित होते आहे. यापैकी एका चिठ्ठीमध्ये “कोणीही मरणार नाही, मात्र काही महान ध्येय साध्य केले जाईल.’ असे लिहीले आहे. यामुळे या प्रकारामध्ये गूढ आणखीन वाढले आहे. या मृत्यूमागे अंधश्रद्धा असण्याच्या शक्यतेला या चिठ्ठ्यांमुळे बळच मिळत आहे. यामागे कोणी तांत्रिक असल्याच्या शक्यतेनेही तपास सुरू आहे.