तो सजिर्कल नव्हे फर्जिकल स्ट्राईक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/arun-shourei-.jpg)
- अरूण शौरींनी उडवली मोदी सरकारची खिल्ली
नवी दिल्ली – मोदी सरकारच्या काश्मीर धोरणावर सडकून टीका करतानाच त्यांच्या पाकिस्तान विषयक धोरणावरही भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा करून फुशारकी मारणाऱ्या मोदी सरकारचा तो सर्जिकल स्ट्राईक नव्हता तर तो एक फर्जिकल स्ट्राईक होता अशी टीकाही त्यांनी केली आहे. फर्जिकल स्ट्राईक हा शब्द आपण लष्कराला उद्देशून नव्हे तर सरकारला उद्देशून वापरला आहे असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
काश्मीरातील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सैफुद्दीन सोझ यांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी त्यांनी मोदी सरकारवर ही टीका केली. ते म्हणाले की जम्मू काश्मीरात आणि सीमेवर स्वताच्या प्राणाची बाजी लाऊन जवान शौर्य गाजवतात आणि त्यांच्या शौर्यावर हे फुशारकी मारतात. काश्मीर, पाकिस्तान, चीन आणि देशातील बॅंकांच्या बिघडलेल्या स्थितीबाबत या सरकारकडे कोणतेही ठाम धोरण नाही असे ते म्हणाले. तथाकथीत सर्जिकल स्ट्राईकनंतर काश्मीरातील स्थितीत कोणताच फरक पडलेला नाहीं असेही शौरी यांनी नमूद केले. ते म्हणाले की काश्मीरच नव्हे तर देशातील कोणत्याही क्षेत्रातील स्थितीत मोदी सरकारच्या काळात कसलाही फरक पडलेला नाहीं. हिंसा किंवा धाकदपटशाहीने काश्मीरवर तोडगा निघणार नाही त्यासाठी चर्चेचाच मार्ग अवलंबा लागेल असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना सोझ म्हणाले की वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांच्या काळात काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्याची संधी आली होती पण वाजपेयींना व्यवस्थेने हा तोडगा काढू दिला नाहीं. तर मनमोहनसिंग यांच्या काळात तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली असताना पाकिस्तानात निर्माण झालेल्या हिंसाचारामुळे ही संधी वाया गेली असे ते म्हणाले.