चहा पिणारे लोक अधिक क्रिएटीव्ह आणि स्पष्ट विचारांचे असतात, संशोधकांचा दावा
सकाळ, दुपार, संध्याकाळ दिवसातील कोणत्याही वेळी चहा विचारल्यानंतर हो असं उत्तर देणारे आपल्यापैकी अनेकजण आहेत. भारतामधील सर्वाधिक प्यायले जाणारे पेय असणारा चहा पिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चहा प्यायल्याने एकाग्रता वाढते ज्यामुळे मनामधील अनेक गोष्टींबद्दलचे विचार अधिक स्पष्ट होतात असं एका अभ्यासामध्ये समोर आले आहे. चीनमधील पेकिंग विद्यापिठामधील एका अभ्यासानंतर हा निष्कर्ष अभ्यासकांनी मांडला आहे.
राजधानी बिजिंगमधील पेकिंग विद्यापिठामधील अभ्यासकांनी केलेल्या संशोधनामध्ये चहामधील कॅफीन आणि थेनीन या घटकांमुळे व्यक्ती सतर्क आणि सजग राहतो असं म्हटलं आहे. चहामधील कॅफीन आणि थेनीनचा मेंदूमधील क्रिएटीव्ह विचारशक्तीशी कसा संबंध आहे याबद्दलही अभ्यासामध्ये सांगण्यात आले आहे. चहा प्यायलानंतर लगेचच व्यक्तीच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना जन्म घेतात असंही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. या अभ्यासाअंतर्गत मानसोपचारतज्ञांनी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये ५० विद्यार्थ्यांच्या मदतीने काही प्रयोग केला. सरासरी २३ वर्ष वयोगट असणाऱ्या या दोन्ही गटांमधील एका गटातील विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास दिले तर दुसऱ्या गटातील मुलांना कोरा चहा प्यायला दिला. त्यानंतर या विद्यार्थ्यांना काही ठोकळे देऊन त्यापासून क्रिएटीव्ही आणि आकर्षक आकाराच्या इमारतींची रचना तयार करण्यास तसेच वेगवेगळ्या थीमवर आधारित हॉटेल्ससाठी नावे सुचवण्यास सांगण्यात आले. त्यांनी तयार केलेली रचना आणि नावांवरुन त्यांच्या डोक्यामधील विचारांवरुन चहा पिणाऱ्या विद्यार्थीचे विचार हे अधिक क्रिएटीव्ह आणि आकर्षक असतात असा निष्कर्ष मानसोपचारतज्ञांनी काढला. या अभ्यासामध्ये एखादी व्यक्ती दिवसभरामध्ये कितीवेळा चहा पिते यावर तिचे विचार किती क्रिएटीव्ह आहेत हे ठरतं असंही म्हटलं आहे. चहा हा विचारशक्तीसाठी चांगला असला तरी अतीसेवन धोकादायक असल्याचा इशारा अभ्यासकांनी दिला आहे. गरज असेल तेव्हाच चहा प्यायला हवा असंही संशोधकांनी आपल्या निष्कर्षांमध्ये म्हटले आहे.
या अभ्यासामधील सर्व निष्कर्ष ‘फूड क्वॉलिटी अॅण्ड प्रेफरन्स जर्नल’मधील एका विशेष लेखामध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. दिवसभरात अनेकदा चहा प्यायल्यास क्रिएटीव्ह विचार डोक्यात येतात असं अभ्यासकांनी म्हटले आहे. चहाचा विचारशक्तीवर कसा परिणाम होतो यासंदर्भात हे संशोधन करण्यात आले आहे. या अभ्यासामुळे आपण ज्या गोष्टींचे सेवन करतो त्या गोष्टींचा आपल्या विचारशक्तीवर कसा परिणाम होतो हे समजून घेणे शक्य होणार आहे. मानवी आकलनशक्ती आणि अन्नपदार्थांमधील संबंधांसंदर्भातील अभ्यासासाठी याची मदत होईल असंही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.