गांधी जयंतीला रेल्वे होणार ‘शाकाहारी’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/railway-ex.jpg)
रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव : वॉटरमार्क छायाचित्र असलेले तिकीटांचे होणार वितरीत
नवी दिल्ली – येत्या दोन ऑक्टोबरला देशात फक्त राष्ट्रीय स्वच्छता दिवसच नव्हे तर महात्मा गांधींच्या सन्मानार्थ “शाकाहार दिवस’ म्हणूनही साजरा केला जाईल. यासाठी रेल्वेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणे गरजेचे आहे. रेल्वेने तयार केलेल्या या प्रस्तावानुसार दोन ऑक्टोबर 2018, 2019 आणि 2020 मध्ये रेल्वे स्थानक किंवा कार्यालय परिसरात प्रवाशांना मांसाहार जेवण दिले जाणार नाही. केंद्र सरकारने 2020 मध्ये महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रेल्वेने “शाकाहार दिवस’ साजरा करण्याबरोबरच साबरमतीपासून गांधीजींशी निगडीत विविध स्थानकांसाठी “स्वच्छता एक्स्प्रेस’ आणि दांडी मार्चनिमित्त 12 मार्चला साबरमतीवरून एक विशेष “मीठ रेल्वे’ नेण्याची नियोजन केले आहे.
रेल्वे महात्मा गांधींचा वॉटरमार्क छायाचित्र असलेले तिकीट वितरीत करणार आहे. त्यासाठी त्यांना सांस्कृतिक मंत्रालयाच्या मंजुरीची गरज आहे. या महिन्याच्या सुरूवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रीय समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान भुषवले होते. दरम्यान, गतवर्षी रेल्वेने सर्व विभागांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले होते की, दोन ऑक्टोबर 2018, 2019 आणि 2020 ला संपूर्णपणे शाकाहारी दिवस साजरा केला जाऊ शकतो. या दिवशी संपूर्ण भारतातील रेल्वे परिसरात कोठेही मांसाहार पदार्थ दिले जाऊ नयेत. सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना शाकाहार दिवस साजरा करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे. त्याचबरोबर महात्मा गांधींशी निगडीत स्थानकांवर विशेष पेंटिग्ज लावण्याचीही योजना आहे. या स्थानकावर डिजिटल संग्रहालय तयार केले जातील. या रेल्वे स्थानकांवर गांधींशी निगडीत माहिती दिली जाईल. त्याचबरोबर सर्व विभागीय मुख्यालयांच्या स्थानकांवर आणि प्रशासकीय इमारतींमध्ये गांधीजींचे पेंटिग्ज लावण्याची योजना तयार करण्यात आली आहे.