गणेशोत्सवामुळे उत्तर भारतीयांना रोजगाराच्या संधी
राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा अनेकांसाठी रोजगार उपलब्ध करुन देण्याचे मोठ साधन आहे. राज्यातीलच नव्हे तर उत्तर भारतातील कारागिरांना यातून रोजगारीची मोठी संधी उपलब्ध होत असते. गणेशोत्सवाच्या पाश्र्वभुमीवर दरवर्षी अनेक उत्तर भारतीय ढोलकी कारागीर कोकणात दाखल होत असतात. यातून त्यांना चांगली कमाई देखील मिळते.
उत्तर भारतातील अरबाज इकबाल व त्यांचे सहकारी गणेशोत्सवाच्या पाश्र्वभुमीवर सध्या कोकणात दाखल झाले आहे, रायगड जिल्ह्यातील पेण येथे मुंबई गोवा महामार्ग आणि रेल्वे स्थानका लगतच्या परिसरात त्यांनी आपला मुक्काम ठोकला आहे. अरबाज यांची इथे येण्याची हि पहिली वेळ नाही. त्यांच्या तीन पिढ्या दरवर्षी न चुकता गणेशोत्सवाच्या पाश्र्वभुमीवर कोकणात दाखल होत आल्या आहेत.
ढोलकी बनवणे आणि त्यांची विक्री हा त्यांचा पारंपारीक व्यवसाय आहे. त्यामुळे दरवर्षी न चुकता गणेशोत्सवाच्या काळात ते कोकणात दाखल होतात. पेण येथे मुक्काम करून ते वेगवेगळ्या प्रकारच्या ढोलक्या बनवतात. आणि रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विवीध भागात जाऊन ते ढोलक्या विकतात. यातून त्यांना आणि त्यांच्या सहकारयांना चांगले अर्थार्जनही होत असते.
उत्सवप्रिय कोकणात गणेशोत्सव मोठा भक्तीभावाने साजरा केला जातो. या सणाच्या निमित्याने मुंबई ठाणे परिसरात वसलेले चाकरमानी कोकणात दाखल होतात. आणि घराघरात गणेशांची प्राणप्रतिष्ठा केली जाते. सात दिवस पारंपारिक पध्दतीन गणरायाची आराधना केली जाते. गणेशाच्या आरतीच्या वेळी ढोलकी आणि टांळ यांना अनन्य साधारण महत्व असते. टाळमृदुंग आणि ढोलक्यांच्या ठेक्यावर घराघरातून या काळात आरत्यांचे सुर ऐकायला मिळतात.
ही बाब लक्षात घेऊन इकबाल आणि त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होतात. ढोलकी बनवण्यासाठी आंबा, शिसम, खैर, आईन अशा विवीध प्रकारच्या लाकडांचा वापर केला जातो. या लाकडाचा वापर करून विवीध आकाराच्या चांगल्या दर्जाच्या ढोलक्या तयार केल्या जातात. या ढोलक्यांची किमंत तिनशे पासून तीन हजार रुपयांपर्यंत असते. गणेशोत्सव हा प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा होणारा सण असला तरी यातून या उत्तर भारतीय कारागिरांना रोजगाराची संधी उपलब्ध होते.
गणेशोत्सवात ढोलक्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे दरवर्षी आम्ही उत्तर भारतातून येथे येतो, गावात जाऊन ढोलक्या विकतात, त्यातून चांगले पसेही मिळतात, गणशोत्सवानंतर परत गावाकडे निघून जातो. आमच्या कलेची साधनाकरून गणपतीची आराधना करण्याची संधी आम्हाला मिळते असेही हे कारागीर सांगतात.