खोट्या आरोपांमुळे माझे कुटुंबीय तणावात, आई अस्वस्थ: रॉबर्ट वद्रा
पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल आल्यानंतर एकीकडे काँग्रेसमध्ये उत्साह दिसून येत आहे. तर दुसरीकडे सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वद्रा यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाकलेल्या धाडीवरुन वद्रा यांनी टीका केली आहे. हा माझ्यावर अन्याय आहे. यामुळे माझे कुटुंबीय आणि मुलं तणावात आहेत. आईची प्रकृतीही अस्वस्थ आहे, असे त्यांनी म्हटले.
ते म्हणाले, माझ्याविरोधातील सर्व आरोप खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत. मी प्रत्येक नोटिशीला उत्तर दिले आहे. परंतु, या सर्व प्रकारामुळे माझे संपूर्ण कुटुंबीय तणावात आहे. आईची प्रकृती ठीक नाही. माझे संपूर्ण घराचे नुकसान केले आहे. त्यांनी घराचे कुलूपही तोडले आहे. सर्व काही कायद्याने केले पाहिजे. मी प्रत्येकवेळी सहकार्य करत आलो आहे.
राजकीय कट कारस्थानासाठी माझ्या नावाचा मी वापर करु देणार नाही. मी देश सोडून पळून जात नाहीये. मी नेहमी सहकार्यासाठी तयार असतो. परंतु, तपास निष्पक्ष आणि कायदेशीर मार्गाने व्हावे, असे म्हणत मी कोणालाही घाबरत नसल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, ईडीने सप्टेंबर २०१५ मध्ये राजस्थानच्या बिकानेर येथील जमीन व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ईडी बिकानेरमधील वादग्रस्त जमिनीच्या व्यवहाराचा तपास करत आहे. यामध्ये वद्रा यांच्या कंपन्यांचाही समावेश आहे. वद्रा यांनी बिकानेर येथील कोलायत परिसरात ही जमीन खरेदी केली होती. नंतर त्यांनी जमीन विकली होती. राजस्थान सरकारने यापूर्वीच हा व्यवहार रद्द केला आहे. चुकीच्या पद्धतीने ही जमीन खासगी क्षेत्राला दिल्याचा आरोप आहे.