खरी अयोध्या नेपाळमध्ये, प्रभू रामचंद्र भारतीय नव्हे- नेपाळचे पंतप्रधान के पी ओली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Nepal-Prime-Minister-KP-Oli.jpg)
काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यांना खुर्ची संकटात येताच प्रभू रामावरुन राजकारण करण्याची बुद्धी झाल्याचे दिसत आहे. खरी अयोध्यानगरी भारतात नसून नेपाळमध्ये आहे, तर प्रभू रामचंद्रही नेपाळी होते, असा जावईशोध ओली यांनी लावला.
आपली सत्ता जात असल्याचे पाहून ओली सातत्याने भारताला लक्ष्य करत आहेत. सोमवारी त्यांनी दावा केला की सांस्कृतिक अतिक्रमणासाठी भारताने ‘बनावट अयोध्या’ तयार केली. खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे. त्यावेळी आधुनिक वाहतूक आणि मोबाईल फोनसारखी दळणवळणाची साधने नव्हती, मग राम जनकपुरात कसे आले? असा प्रश्न त्यांनी विचारला.
भारत आपल्याला सत्तेवरुन दूर करण्याचा कट रचत आहे, असे ओली यापूर्वी म्हणाले होते. जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी केपी ओली कधी नवीन नकाशात भारतीय प्रदेश दाखवत आहेत, तर कधी नेपाळमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार करण्यासाठी भारतातून आलेल्या लोकांना दोष देत आहेत.
नेपाळी कवी भानुभक्त आचार्य यांच्या 206 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थान ब्ल्यू वॉटर येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की “नेपाळवर सांस्कृतिकदृष्ट्या अत्याचार होत आहेत. ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड केली जात आहे. आमचा अजूनही विश्वास आहे की आम्ही भारतीय राजपुत्र रामाला सीता दिली”
भगवान राम यांच्या जन्मस्थळाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ओली यांना स्वतःच्या देशातही टीकेला सामोरे जावे लागत आहे. अनेक नेपाळी नेत्यांनी ओली यांच्या वक्तव्याचा उघडपणे विरोध केला आहे. भारत आणि नेपाळमध्ये तणावाची परिस्थिती असताना ओली यांनी वादग्रस्त दावे टाळावेत, असा सल्ला त्यांना दिला जात आहे.