कॉ. पानसरे हत्या प्रकरणी आरोपींचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला
![Ashutosh Kale's run in the Supreme Court](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/court-hammer.jpg)
कोल्हापूर – पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित मारेकरी भरत कुरणे आणि सचिन अंदुरे या दोघांचा जामीन अर्ज येथील सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावला. या अर्जाची जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्या समोर सुनावणी झाली.
कोल्हापुरात फेब्रुवारी 2015 साली कॉ. गोविंद पानसरे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पानसरे हत्या प्रकरणात एसआयटीने कुरणे आणि अंदुरे या दोघांना गेल्या वर्षी अटक केली होती. भरत कुरणे याला एसआयटीने बंगळुरू कारागृहातून ताब्यात घेतले होते. या हत्या प्रकरणी तपास यंत्रणेने आतापर्यंत सचिन अंदुरे, भरत कुरणेसह 21 जणांविरोधात गुन्हे दाखल करून 19 जणांना अटक केली आहे. आकोलकर आणि पवार हे दोघेही अद्याप फरार आहेत. त्यांचा तपास यंत्रणांकडून शोध घेतला जात आहे. याच दरम्यान अटक केलेल्या अंदुरे आणि कुरणे या दोघांनी आपली जामिनावर सुटका करावी यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सरकारी पक्षाकडून व या दोघा वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. या युक्तिवादावेळी अंदुरे व कुरणे याचा अप्रत्यक्ष पानसरे हत्येचा कट रचण्यामध्ये सहभाग आहे. त्यांना जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो. त्यामुळे या दोघांचा जामीन अर्ज फेटाळावा अशी मागणी विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर केली. ती ग्राह्य धरत न्यायालयाने या दोघांचाही जामीन अर्ज फेटाळून लावला.