कुमार विश्वास जेव्हा रामराज्यातील बजेटबाबत बोलतात…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Kumar-vishwas.jpg)
शुक्रवारीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प कसा होता? यावर मतप्रदर्शनास सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या तमाम खासदारांनी, नेत्यांनी या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे. तर विरोधकांनी टीका केली आहे. प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी मात्र बजेट कसं असावं? रामराज्यातही बजेटची म्हणजेच कराची व्यवस्था कशी होती याचं खूप छान उदाहरण दिलं आहे. कुमार विश्वास बोलत असतानाचा चार मिनिटांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत कवी तुलसीदास यांची उदाहरणे देत त्यांनी खूप उत्तमरित्या रामराज्यात बजेट कसं होतं ते समजावून सांगितलं आहे.
काय म्हटले आहेत कुमार विश्वास?
प्रभू रामाचे नाव घेतल्याने काहींना त्रास होतो, काहीजण त्यावर आक्षेप घेतात. मात्र त्यांना हे ठाऊक नाही की महात्मा गांधींनी १९३० मध्ये नवजीवन पत्रिका या दैनिकात लेख लिहिला होता. ‘स्वराज और रामराज’ असे त्या लेखाचे नाव होते. त्यामध्ये रामराज्याचा उल्लेख महात्मा गांधींनीही केला आहे. हेच उदाहरण घ्यायचं झालं तर तुलसीदास यांच्या रामचरितमानस या ग्रंथाशिवाय इतर ग्रंथांमध्येही रामराज्यातील कररचना कशी होती याचा उल्लेख आढळतो.
कर व्यवस्थेला लाखो वर्षांची परंपरा आहे. प्रभू रामचंद्र आणि त्यांचा भाऊ भरत यांची जेव्हा भेट घेतली तेव्हा त्यांनी कर व्यवस्था कशी आहे ? असं विचारलं तेव्हा भरताने उत्तर दिलं ज्याप्रमाणे एक राजा कर घेतो त्याचप्रमाणे. त्यावर प्रभू रामचंद्रांनी त्याला उत्तर दिलं की कर सूर्याप्रमाणे घेतला पाहिजे. सूर्य जेव्हा पाण्याची वाफ तयार करतो तेव्हा ते पाणी समुद्र, नदी, तलाव, नाले या सगळ्यांमधून घेतो. मात्र ते घेतल्याचं कळत नाही. मात्र हे पाणी जेव्हा ढगातून पावसाच्या रूपाने जेव्हा पावसाच्या रूपाने बरसतं तेव्हा लोक आनंदी होतात. करप्रणाली ही अशीच असली पाहिजे असं प्रभू रामचंद्रांनी भरताला सांगितल्याचं कुमार विश्वास यांनी म्हटलं आहे.
पाहा व्हिडिओ